सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील दुर्बल घटकांसाठी देखील तितकीच तरतूद करण्यात आली आहे.
आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये राज्यातील दुर्बल घटकांसाठी देखील अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हेच शाश्वत विकासाचे ध्येय निश्चित करणे आहे असे अजित पवार म्हणाले. राज्यातील दुर्बल घटकांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील दुर्बल समाजासाठी नागरिकाच्या अर्थसाहाय्यात एक हजारावरून दीड हजार इतकी वाढ करण्यात आली आहे. बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना देखील आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३४ हजारांपेक्षा जास्त घरे बांधली जाणार आहेत.
दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप केले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू केली गेली आहे. राज्यात ३४७ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फिरता दवाखाना कार्यरत असणार आहे. राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाअखेर ३ सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेचा ५२ लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे. तसेच राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांना दिल्या जाणार आहेत.