टीम इंडिया T20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्याच्या आनंदासोबतच मात्र भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी डोळ्यात पाणी आणणारी बातमी समोर आली आहे.भारताला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे.T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरल्यानंतर विराट कोहलीने T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.त्याच्यापाठोपाठ लगेचच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यानेही आपली T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे
विराट कोहलीने T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात 76 धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा किताब जिंकला. सामन्यानंतर कोहली म्हणाला आहे की , “हा माझा शेवटचा T20 विश्वचषक होता आणि मला हेच साध्य करायचे होते. एखाद्या दिवशी तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाही, तेव्हा अनेक गोष्टी घडतात. देव महान आहे, आणि आजचा दिवस संघासाठी एक महत्त्वाचा दिवस होता, त्या दिवशी मी संघासाठी काम पूर्ण केले.”
कोहली पुढे म्हणाला, “आता किंवा कधीच नाही, अश्या मनस्थितीत भारतासाठी हा माझा शेवटचा टी-२० सामना होता. मला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता आणि तो यशस्वी झाला. चषक उचलायचा होता, तो उचलता आला आता पुढच्या पिढीची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि विजयाचा ध्वज उंच फडकवत ठेवतील.”
तर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे की “गुड बाय म्हणण्यासाठी आताच्या सारखी चांगली वेळ नाही. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतूर होतो. आम्हीं ते साध्य केले, त्यामुळे खूप आनंद होतो आहे”..
वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे आज खेळल्या गेलेल्या 2024 ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकला आहे. कोहलीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले, तर मालिकावीराचा किताब वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देण्यात आला. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत एकही सामना न गमावलेला पहिला संघ ठरला आहे. 2024 च्या T20 विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया अपराजित राहिली.