बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने पाकिस्तानातून एके-४७ रायफल मागवून २५ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. यासोबतच सलमान खानच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी जवळपास ६० ते ७० लोकांना नियुक्त करण्यात आले होते.अशी माहिती संबंधित गुन्हेगारांविरुद्ध तयार करण्यात आलेल्या आरोप पत्रातून समोर आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या 350 पानी आरोपपत्रातून ही बाब उघड झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील डिटेक्टिव्ह एजन्सीची माहिती, आरोपीचा मोबाईल फोन, त्याचे संभाषण, व्हॉट्सॲप ग्रुप, टॉवर लोकेशन आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल्सच्या आधारे पुरावे गोळा केले आहेत. त्याआधारे 350 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार, बिश्नोई टोळीने ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सलमान आणि सिद्धू मूसवाला यांना मारण्याची योजना आखली होती. बिश्नोई टोळीने सलमान खानवर हल्ला करण्यासाठी २५ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते आणि पाकिस्तानकडून एके-४७ रायफल खरेदी केल्या होत्या.
14 एप्रिल रोजी सकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पाच गुंडाना अटक करण्यात आली होती. यामध्ये धनंजय तापसिंग उर्फ अजय कश्यप (28), गौतम विनोद भाटिया (29), वास्पी मेहमूद खान उर्फ चेना (36), रिजवान हसन उर्फ जावेद खान (25) आणि दीपक हवासिंग उर्फ जॉन वाल्मिकी (30) यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान,या गुंडानी नवी मुंबई पोलिसांना सांगितले की, सलमान खानच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी जवळपास ६० ते ७० लोक होते. हे सर्व लोक हे अपडेट एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करत होते. हे 60 ते 70 लोक सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट, पनवेल फार्महाऊस आणि फिल्मसिटीमधील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते.