पाकिस्तानातील एका न्यायालयाने एका ख्रिश्चन व्यक्तीला ईशनिंदा केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहसान राजा मसिह याने इंटरनेट मीडियावर निंदनीय पोस्ट केली होती. गेल्या वर्षी या पोस्टमुळे जमाव संतप्त झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये फैसलाबादच्या जरनवाला तहसीलमध्ये संतप्त जमावाने 24 चर्च आणि ख्रिश्चनांची 80 हून अधिक घरे जाळली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी 200 हून अधिक मुस्लिमांना ताब्यात घेतले. मात्र, त्यापैकी कोणालाही अद्यापपर्यंत दोषी ठरवण्यात आलेले नाही. त्यापैकी १८८ जणांना कोर्टाने त्यांच्याविरुद्ध पुराव्याअभावी किंवा जामिनावर सोडले आहे. मात्र दहशतवादविरोधी न्यायालयाचे विशेष न्यायाधीश (साहिवाल) झियाउल्ला खान यांनी शनिवारी आरोपी अहसान राजा मसिहला फाशीची शिक्षा सुनावली आणि त्याला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याला पाकिस्तान दंड संहिता (PPC), दहशतवाद विरोधी कायदा (ATA) आणि इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधक कायदा (PECA) च्या विविध कलमांतर्गत एकूण 22 वर्षांचा तुरुंगवासही सुनावण्यात आला आहे.
मसीहने केलेला गुन्हा असा आहे की, त्याने टिकटॉकवर “निंदनीय मजकूर शेअर केला होता आणि त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या होत्या. पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध पीपीसी, एटीए आणि पीईसीएच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चर्च आणि ख्रिश्चन घरे जाळण्यात सहभागी असलेल्या एकाही संशयिताला सोडले जाणार नाही, असे या घटनेनंतर पाकिस्तान सरकारने मोठे दावे केले होते.मात्र प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचे आरोप सर्रास होतात. देशाच्या ईशनिंदा कायद्यांतर्गत, इस्लाम किंवा इस्लामिक धार्मिक व्यक्तींचा अपमान केल्याबद्दल दोषी आढळल्यास मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. ख्रिश्चन आणि हिंदूंसह अल्पसंख्याकांवर वारंवार ईशनिंदेचे आरोप केले जातात.अनेकदा न्यायालयात प्रकरण जायच्या आधीची या अल्पसंख्याकांना मुस्लिम जमावाकडून मारहाण केली जाते. तसेच बऱ्याचदा त्यांची निर्घृण हत्याही केली जाते.
ऑल मायनॉरिटी अलायन्सचे अध्यक्ष अकमल भाटी म्हणाले की, सुमारे एक वर्ष उलटून गेल्यानंतरही जरनवाला येथील डझनभर चर्च आणि ख्रिश्चनांची घरे जाळल्याचा आरोप असलेल्या (मुस्लिम व्यक्तीं पैकी )एकालाही अद्याप दोषी ठरविण्यात आलेला नाही.
“सध्या 12 मुस्लिम आरोपींवर खटला सुरू आहे, तर उर्वरित एकतर खटल्यातून सुटले आहेत किंवा जामिनावर सुटले आहेत,” असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.