Budget Discussion : अर्थसंकल्पाच्या दोन दिवसांनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पावर चर्चा न करून विरोधक जनादेशाचा अपमान करत असल्याचे रिजिजू म्हणाले आहेत. तसेच, विरोधक सध्या पंतप्रधानांना वाईट बोलण्यात व्यस्त आहेत. तसेच आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
किरेन रिजिजू म्हणाले, ‘काल (24 जुलै) अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला दिवस होता. देशवासीयांना अर्थसंकल्पावर चर्चा हवी आहे, परंतु काही विरोधी नेत्यांनी काही विधाने केली आहेत, ज्याचा मी निषेध करू इच्छितो. विरोधक फक्त राजकारण करत आहेत. ते जनतेच्या जनादेशाचा अपमान करत आहेत. विरोधकांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टीका केली. ते पंतप्रधानांना वाईट बोलण्यास वाव देत आहेत. हे विरोधकांना शोभत नाही. मी पुन्हा विरोधकांना अर्थसंकल्पावर सौहार्दपूर्ण चर्चा करण्याचे आवाहन करतो.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, ‘विरोधक विषय बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थसंकल्पात केलेली तरतूद ऐतिहासिक आहे, अर्थसंकल्पाचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठी विरोधकांनी अधिक सूचना द्याव्यात. मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत त्यांनी विरोधकांचा खपूरस समाचार घेतला आहे.
अर्थसंकल्पावर विरोधकांची सातत्याने टीका
अर्थसंकल्प सादर झाल्यापासून विरोधक सातत्याने विरोध करत आहेत. कालच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन राज्यांशिवाय कोणालाच काही मिळाले नाही, असे म्हटले होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याने ओडिशापासून दिल्लीपर्यंत नावांची यादी केली आणि सांगितले की आम्हाला (कर्नाटक) जास्तीत जास्त फायदा होईल अशी आशा होती. आम्हाला काहीच मिळाले नाही. आम्ही इंडिया ब्लॉकचे खासदार याचा निषेध करतो.