Women’s Asia Cup T20 2024 : वूमन्स टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघ यांच्यात उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात 7 वेळची चॅम्पियन टीम इंडियाने बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 80 धावा केल्या. 81 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांनी अवघ्या 11 षटकांत लक्ष्य गाठले आणि नवव्यांदा महिला आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या सामन्याची खरी हिरो रेणुका सिंग ठाकूर ठरली. तिला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानाने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच बांगलादेशवर दवाब आणला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने बांगलादेशच्या टॉप ऑर्डरला एका मागून एक पॅव्हेलियन मध्ये पाठवत संघाची धावसंख्या 21/3 पर्यंत नेली. यानंतर भारतीय फिरकीपटूंनी आपली कमाल दाखवली आणि बांगलादेश संघाला 80 धावांच्या आत गुंडाळले. भारताकडून रेणुका सिंह ठाकूर आणि राधा यादव यांनी ३-३ बळी घेतले, तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी १-१ विकेट घेतली.
टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी फक्त 81 रन्सचं टार्गेट होतं. सलामीला फलंदाजीला आलेल्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी 11 षटकांत लक्ष्य गाठले आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला. टीम इंडियासाठी स्मृती मंधानाने 39 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले, तर शेफाली वर्माने 26 धावा केल्या ज्यात केवळ 2 चौकारांचा समावेश होता.
टीम इंडियाचा अंतिम सामना श्रीलंका किंवा पाकिस्तानशी होईल. यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल, ज्याचा विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.