कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर निवासी डॉक्टरांकडून देशभरात निषेध होत आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बुधवारी भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय आणि मीडिया रिपोर्ट्स वाचल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दिसून आले आहे. तपासाला उशीर का झाला, याचे उत्तर आज त्यांना द्यावे लागणार आहे. पहिले ४८ तास पुरावे गोळा करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पण ममता बॅनर्जी यांनी सीबीआयकडे तपास सोपवायला पाच दिवस घेतले.
ममता बॅनर्जी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा त्या काही दिवसांनी केस हस्तांतरित करतील. प्रश्न आहे की काही दिवसांनी का? हे प्रकरण तात्काळ सीबीआयकडे लगेच वर्ग केले असते तर आज निष्पक्ष तपास झाला असता आणि गुन्ह्याचे ठिकाण सुरक्षित राहिले असते.असे भाटिया म्हणाले आहेत.
ममता सरकारवर गंभीर आरोप करत भाटिया म्हणाले की, राज्यातील सुरक्षा दल गुन्हेगारांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे, मग राज्यातील महिला सुरक्षित कशा राहतील. ते म्हणाले की, आता फक्त तृणमूलचे नेते आंदोलनाबाबत बोलत आहेत, पण ते कोणाच्या विरोधात आंदोलन करणार हा प्रश्न आहे. ज्यांच्यावर मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच सरकारचा निषेध करणारी वक्तव्ये देतात. महिलांना सुरक्षा देण्यात ममता सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
पुढे ते म्हणाले की, आज संपूर्ण देश पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. पण ममता बॅनर्जींना पाच दिवसांत एक दिवसही पीडित कुटुंबाला भेटायला वेळ मिळाला नाही. पश्चिम बंगाल सरकारकडे हे प्रकरण पाच दिवस चालले होते, पण त्यांच्याकडे पीडितेच्या कुटुंबासाठी वेळ नाही. त्यांना जबाबदारीची जाणीव नाही. पश्चिम बंगाल सरकार खंडणीखोर आणि गुन्हेगारांच्या पाठीशी उभे असल्याचा आरोप भाटिया यांनी केला आहे.