PM Narendra Modi : देशभरात आज 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. 98 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी वन नेशन, वन इलेक्शन पासून समान नागरी कायदा यावर भाष्य केले. आजच्या भाषणातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:-
१५०० हून अधिक कायदे रद्द
देशवासीयांच्या हितासाठी १५०० पेक्षा अधिक कायदे रद्द करण्यात आले. छोट्या छोट्या चुकांसाठी तुरुंगात टाकणारे कायदेही रद्द केले. फौजदारी कायदा बदलला असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
प्रत्येक क्षेत्रात महिलांची ताकद
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. महिला आधारित विकासाच्या मॉडेलवर काम केले आहे. इनोव्हेशन आणि उद्योजकतेसह प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रगती करत आहेत. महिला फक्त सहभागच नाहीत, तर नेतृत्व देखील करत आहेत. आपल्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि अंतराळ क्षेत्रामध्ये महिलांची ताकद दिसून येतेय. 10 कोटी महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत असल्याचं मोदींनी म्हंटल आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर विशेष भर
बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ सुरू झालंय. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर विशेष भर देण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. नव्या शिक्षण नितीमुळे मातृभाषेला बळ मिळाल्याचं मोदी म्हणाले आहेत.
वन नेशन, वन इलेक्शन
वन नेशन, वन इलेक्शनसाठी देशाला पुढे यावं लागेल. भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करायचं आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
लवकरच देशभरात ६ जी लॉंच केलं जाणार
देशामध्ये लवकरच ६ जी लॉंच केलं जाईल, अशी घोषणा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केलीय. ६ जी मिशन मोडवर काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षांत मेडिकल कॉलेजमध्ये ७५ हजार जागा
मेडिकलच्या शिक्षणासाठी विद्यार्थी देशाबाहेर जात आहेत. त्यामुळे दहा वर्षांमध्ये मेडिकल जागांची संख्या वाढवली. सध्या संख्या एक लाख झालीय. पुढील पाच वर्षांत मेडिकल कॉलजमधील ७५ हजार नव्या जागा वाढवण्यात येणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
भारताचा संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदय
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अगोदर आपण बाहेरुन शस्त्रे खरेदी करत होतो, त्यासाठी डिफेन्स बजेट वेगळं ठेवण्यात यायचं. आता आपण संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबी होत आहोत. भारत संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे.
२०३६ मध्ये भारत करणार ऑलिम्पिकचे आयोजन
भारताने जी२० चे यशस्वी आयोजन केले. अनेक शहरात २०० पेक्षा जास्त इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. भारत देश मोठे इव्हेंट यशस्वी आयोजित करु शकतो, हे दाखवून दिलंय. त्यामुळे २०३६ मध्ये होत असलेले ऑलिम्पिकचे यजमानपद आपल्याला मिळावे, हे स्वप्न असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपलं स्थान
जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपलं स्थान निश्चित झालं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
संशोधनावर १ लाख कोटी रूपये खर्च करणार
संशोधन आणि नवोपक्रमावर १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचं वचन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.