दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात दिलासा मिळणार का या चर्चा रंगत होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने आता केजरीवाल यांना तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला आहे.
या प्रकरणाची सुनावणी 5 सप्टेंबरला होणार असून सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला नकार देण्यात आला आहे. सीबीआयच्या प्रकरणात त्यांना अजूनही जामीन मिळाला नाही परंतु ईडीत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. या कारणामुळेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून अद्यापही सुटका झालेली नाही.
न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सीबीआयने केजरीवाल हेच मद्यधोरण गैरव्यवहाराचे प्रमुख सूत्रधार आहेत, यामुळेच त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला.
दरम्यान, केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सीबीआयच्या या युक्तिवादाला विरोध केला परंतु सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकारच दिला आहे. यामुळे आता पुढील सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.