सिंधुदुर्गातील मालवण परिसरात कोसळलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. .
पाटील याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई सुरू केली होती आणि त्यानंतर त्याला शुक्रवारी पहाटे 12.30 वाजताच्या सुमारास कोल्हापुरातून अटक करण्यात आली. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आज त्याला सिंधुदुर्गात आणण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी एका कंत्राटदारालाही अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 109, 110, 125, 318 आणि 3(5) अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरची सिंधुदुर्ग पोलिसांनी पुष्टी केली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक यांसह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चेतन पाटील आपले राहते घर असलेल्या कोल्हापूरमधून फरारी झाले होते.
दरम्यन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी युद्धपातळीवर निर्णय घेत असून मालवण परिसरातील पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत आदरणीय असून त्यांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगून त्यांनी विरोधी पक्षांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेची चौकशी करून कारवाई करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी सर्व प्रयत्न सुरू असून नौदलाचे अधिकारी, आयआयटीचे अधिकारी, वास्तुविशारद, अभियंते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार यांना पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण मंत्रालयाने आदल्या दिवशी सांगितले की, सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर स्थापित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या दुर्दैवी नुकसानाची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकार आणि तांत्रिक तज्ञांच्या प्रतिनिधींसह एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.