Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पालघरमध्ये संबोधित करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे.
यावेळी ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी फक्त नाव नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मान झुकवून शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोके ठेवून माफी मागतो.’
पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मालवणमध्ये घडलेल्या घटनेबद्दल माफी मागितली. पुढे ते मोदी म्हणाले, भारताचे महानसुपुत्र वीर सावरकर यांना शिव्या दिल्या जातात. ते माफी मागत नाहीत. त्यांची कोर्टात जायची तयारी असते. मात्र, आमचे संस्कार वेगळे आहेत. शिवाजी महाराजांच्या चरणाव डोकं ठेवून माफी मागतो. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवतेपेक्षा काहीही मोठे नाही, असे ते यावेळी म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मंगळवारी हा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत अनेक ठकाणी आंदोलन केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.