Ram Madhav : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे भाजपचे निवडणूक प्रभारी राम माधव यांनी बुधवारी एक
मोठा दावा केला आहे, त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापन होणार असल्याचे म्हंटले आहे.
राम माधव यावेळी म्हणाले, ‘ही ऐतिहासिक निवडणूक ठरेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ज्या कुटुंबांमुळे जम्मू खोऱ्यातील लोक गेल्या 34 वर्षांपासून मोठ्या दुःखाचा सामना करत आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळेल. जम्मू-काश्मीरमध्ये नवे नेतृत्व उदयास येईल. पुढे ते म्हणाले, भाजप जम्मूमध्ये शांतता, सौहार्द आणि विकास आणेल. ज्यांना शांतता हवी आहे, जे दहशतवादाला अजिबात समर्थन देत नाहीत आणि ज्यांना विकास हवा आहे, असे पक्ष आणि नेते काश्मीर खोऱ्यातही उदयास येतील.
पुढे ते म्हणाले, ‘जुनी वाईट परिस्थिती परत आणण्यासाठी ज्या पक्षांनी निवडणूक लढवली आहे, त्यांना पराभव पत्करावाच लागेल. आणि या राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होईल.”
जम्मू काश्मीरमध्ये कधी होणार मतदान?
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 7 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आणि 9 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत.