महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला असून यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच फडणवीसांनी कॅबिनेटच्या बैठकीत तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे .उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. राज्यातील 288 आमदारांना विधानसभेकडून अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार असल्याचे सांगितले जात आहे.
हंगामी अध्यक्षांनी शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. उद्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय म्हणजेच 7 ते 9 डिसेंबर या काळात विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान,हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कालीदास कोळंबकर प्रतिक्रिया देत म्हणाले आहेत की, पक्षाकडून मला हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मला शपथ घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज दुपारी मी शपथ घेईन मात्र विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याची इच्छा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. पण त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, हे पक्षाकडूनच ठरवले जाईल.
कालिदास कोळंबकर हे भाजपचे आमदार आहेत. ते ९ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर आता त्यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.