रस्ते दुर्घटनेसंबंधी भारताचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की, जागतिक परिषदेत आपले तोंड लपवावे लागते. भारतात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली असून यात बदल घडविण्यासाठी मानवी स्वभावात बदल होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत व्यक्त केली आहे. काल लोकसभेत बोलताना त्यांनी उपरोक्त विषयावर परखड मत व्यक्त केले. यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांची उत्तरं देताना गडकरी म्हणाले की, मी जेव्हा पहिल्यांदा या खात्याचा पदभार स्वीकारला होता. तेव्हा रस्ते अपघातात ५० टक्के घट करण्याचे ध्येय ठेवले होते. पण अपघात कमी होणे दूरच राहिले, तर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. त्यामुळेच मी जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतो, तेव्हा रस्ते अपघाताचा विषय निघाल्यानंतर मला तोंड लपवावे लागते. दुर्दैवाने आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १.७८ लाख बळी पडतात. त्यात ६० टक्के पीडित हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत, अशीही माहिती गडकरी यांनी दिली आहे
इतके लोक ना लढाईत मरतात, ना कोविडमध्ये, ना दंगलीत मरतात. मी जागतिक परिषदेत गेल्यानंतर तोंड लपवतो. दुर्घटनांमध्ये सर्वात खराब रेकॉर्ड आपलाच आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी खासदारांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत आणि परिवहन विभागाच्या मदतीने शाळा इत्यादींमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत . अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल करावा लागेल. समाजालाही बदलावे लागेल. तसेच कायद्याचा सर्वांना सन्मान करावा लागेल.
गडकरींच्या म्हणण्यानुसार, नीती आयोगाच्या अहवालानुसार रस्ते अपघातांतील 30 टक्के बळी जीवरक्षक उपचार न मिळाल्याने मृत्यूमुखी पडतात. दरम्यान उपचारासाठी कॅशलेस योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला असून त्यानंतर तो संपूर्ण देशात लागू केला जाईल. भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. जगातील ज्या देशाला सहज ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते त्या देशाचे नाव भारत आहे. मात्र आम्ही त्यात सुधारणा करत आहोत.असे गडकरी म्हणाले आहेत.