महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेसने फक्त पाठ दाखवली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला. त्यांना भारतरत्न किताब दिला नाही. काँग्रेस केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते, तसेच प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.मात्र संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान देत नाहीत. त्यांचे विचार मानत नाहीत हेच सांगण्याचा प्रयत्न संसदेत गृहमंत्री अमित शाह करत होते. मी त्यावेळी राज्यसभेत उपस्थित होतो. असे म्हणत आता रामदास आठवले यांनी कॉँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
अमित शाह हे भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही तर, काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अवमान केला आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर केला आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात तत्कालीन प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांच्या पुढाकारातून भारतरत्न किताब महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर 34 वर्षांनी देण्यात आला होता.मात्र काँग्रेस सरकारला मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देण्याची आठवण झाली नव्हती. मुंबईत इंदूमिलची जमीन देण्यासाठी 14 वर्षे आंबेडकरी जनतेने संघर्ष केला. मात्र, काँग्रेस सरकारने ती जमीन दिली नाही. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ इंदु मिलची जमीन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला दिली तेथे 1 हजार कोटी खर्च करून जागतिक दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजप एन डी ए सरकारने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मारकाचे काम मार्गी लावले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान हा मनापासून झाला पाहिजे. मात्र काँग्रेस फक्त दिखाऊपणा करीत आहे. अमित शाह यांनी काँग्रेस ने कसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित काम काँग्रेस ने का केले नाही ? बाबासाहेबांना अपेक्षित 370 कलम हटविण्याचे काम काँग्रेस का केले नाही ? डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न का दिला नाही ? काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा दोन वेळा पराभव करून त्यांचा अवमान केला आहे. काँग्रेसच्या चुका दाखवण्याचे काम गृहमंत्री अमित शाह यांनी दाखवले. त्यापासून धडा घ्यायचे सोडून काँग्रेस पुन्हा खोटा खोडसाळ प्रचार करीत आहे. असे म्हणत आठवलेंनी कॉँग्रेसला आरसा दाखवला आहे.
अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला नाही. मात्र, काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अवमान केला आहे याला इतिहास साक्षीदार आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराच्या वृत्तीचा आपण धिक्कार करत असल्याचे नमूद केले आहे.