ताम्हिणी घाटात एका खासगी बसला आज भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही बस लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जात होती. दरम्यान ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ बसला भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत .या अपघातावेळी बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी होते. अपघातग्रस्त बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय पुण्यातील लोहगाव येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास खासगी बसने जात होते.ही खाजगी बस आज सकाळी साडेआठ वाजता ताम्हिणी घाटातून जात असताना वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये २ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे. संगीता धनंजय जाधव , गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरूषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अपघातात २७ हून अधिक लोक जखमी असून त्यांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र अजूनही काही जण बसमध्येही अडकले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. तर रेस्क्यू टीम, आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना तातडीने माण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना पोस्को कंपनीच्या ऍम्ब्युलन्समध्येच तातडीने उपचार करण्यात आले. या घटनेची दखल माणगाव पोलिसांनी घेतली असून पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.