नवीन वर्ष उजाडलं आणि हळूहळू थंडी ओसरू लागली की राज्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांचे वेध लागतात. त्याच अनुषंगाने आता विद्यार्थ्यांची तयारी सुरू असून बहुतांश विद्यार्थी आता कसून अभ्यासाला देखील लागले आहेत. बऱ्याच लोकांच्या अभ्यासाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण बऱ्याच वेळेला अभ्यासू विद्यार्थ्यांवर कॉपीबहाद्दर विद्यार्थी जास्तीचे मार्क्स घेऊन वरचढ ठरतात. म्हणून यंदा राज्य शासनाने बोर्ड परीक्षा अधिक गांभीर्याने घेतली आहे. त्याच अनुषंगाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
राज्यभर होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा या कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.तसेच बऱ्याच केंद्रावर भरारी पथकांची जास्तीची गस्त देखील असणार आहे.