महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 मध्ये बनावट कागदपत्रे तयार केल्याचा व फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?
माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण 1995 ते 1997 दरम्यानचे आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना सरकारकडून गृहनिर्माण योजनेंतर्गत सदनिका मिळाल्या होत्या. त्यांनी दावा केला होता की त्यांचे उत्पन्न कमी आहे आणि त्यांच्याकडे कोणतेही घर नाही. या आधारावर त्यांना सरकारच्या योजनेंतर्गत सदनिका मिळाली होती. मात्र नंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अनियमितता असल्याची तक्रार केली.
1995 मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. माणिकराव कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केली होती. हे प्रकरण 1997 पासून न्यायालयात आहे आणि आता त्यावर आता निर्णय आला आहे.
या प्रकरणात माणिकराव कोकाटे, त्यांचा भाऊ आणि इतर दोघांसह एकूण चार आरोपी होते. न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नियमांनुसार, जर एखाद्या प्रतिनिधीला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा सुनावली गेली तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आता माणिकराव कोकाटे यांना मंत्री आणि आमदारपद गमवावे लागू शकते.
दरम्यान, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की माणिकराव कोकाटे या शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रयत्न करतात का?