प्रचंड ऐतिहासिक आणि महाकुंभ म्हणून नावाजल्या गेलेला महाकुंभ हा प्रयागराज इथ दीड महिन्यापासून सुरू आहे. जवळपास ५१ कोटी भाविकांनी या कुंभमेळ्याला भेट दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या कुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून आतापर्यंत लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती भारतीय व्यापारी उद्योग महासंघाने दिली. हा आजवरचा विक्रम असल्याचा दावाही महासंघाने केला आहे. त्यामुळे कुंभमेळा हा अर्थव्यवस्थेस प्रचंड बुस्ट करणारा फॅक्टर ठरला आहे.
महाकुंभामुळे धार्मिक पर्यटनाबरोबर रोजगारवृद्धीसाठी झाली आहे. या निमित्ताने श्रद्धा आणि आर्थिक विकास याचा उत्तम संगम झाल्याचे महासंघाचे सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी नमूद केलय. कारण सुरुवातीला ४० कोटी भाविक येतील आणि अंदाजे दोन लाख कोटींची उलाढाल होईल असा प्रथमदर्शनी अंदाज होता. मात्र आता भाविकांचा आकडा पन्नास ते साठ कोटींवर गेला असून आर्थिक व्यवहारही तीन लाख कोटींवर जाण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
केवळ प्रयागराजच नव्हे तर वाराणसी,गोरखपूर आणि अयोध्येलाही भाविक भेट देत आहेत. त्यामुळे त्या शहरांतील हॉटेलसह संबंधित सेवा क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. उत्तर प्रदेशात इतरत्रही वैद्याकीय सेवा तसेच तंत्रज्ञान क्षेत्रालाही महाकुंभचा लाभ झाल्याचे खंडेलवाल म्हणाले.
दरम्यान, महाकुंभाचा कार्यकाळ वाढविण्याची मागणी करण्यात आली असली तरी नियोजित वेळेतच सोहळा संपुष्टात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
तब्बल साडेसात हजार कोटींची गुंतवणूक
महाकुंभ निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे साडेसात हजार कोटींची गुंतवणूक केली. रस्ते, उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांची उभारणी करण्यात आली. दीड हजार कोटींची रक्कम पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर खर्च करण्यात आली आहे. या कुंभमेळ्यात फक्त एकच अडचण जाणवली ती म्हणजे आजपर्यंत सगळ्यात संगमापर्यंत चालत जाण्याखेरीज गत्यंतर नाही. तेवढी अडचण वगळता दुसर काहीच नाही. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे कुंभामध्ये हरविणाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.