दिल्ली- तब्बल ७१ वर्षांनंतर दुसऱ्यांदा दिल्लीत ९८ व साहित्य संमेलन पार पडतं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. संजय नहार यांच्या सरहद्द संस्थेच्या माध्यमातून तब्बल ७१ वर्षांनंतर दिल्लीत तीन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते दिल्लीत आज दुपारी विज्ञान भवन येथे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. शुक्रवार २१ ते रविवार २३ फेब्रुवारी दरम्यान हे ३ दिवसीय साहित्य संमेलन दिल्लीत चालणार आहे.
साहित्य संमेलनाला स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीराम पवार आणि साहित्यिक यांचीदेखील उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे. दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनात विविध पॅनेलद्वारे चर्चा, पुस्तक प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध साहित्यिकांसह संवादात्मक सत्रांचे आयोजन केले आहे. हे संमेलन मराठी साहित्याची कालातीत प्रासंगिकता साजरी करेल आणि समकालीन चर्चासत्रात त्याची भूमिका सादर करेल. ज्यामध्ये भाषा जतन, अनुवाद आणि साहित्यकृतींवर डिजिटलायझेशनचा प्रभाव या विषयांचा समावेश असेल.
या साहित्य संमेलनात साहित्यिक रेल्वे प्रवास हे प्रमुख आकर्षण असेल. तर या संमेलनात २,६०० हून अधिक कविता सादरीकरणे, ५० पुस्तकांचे प्रकाशन आणि १०० बुक स्टॉल्स असतील. देशभरातील प्रतिष्ठित विद्वान, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी सहभागी होतील असं म्हटलं जातय.
१९५४ साली पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते तर त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होतें. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते विठ्ठलराव गाडगीळ. त्यानंतर आता तब्बल ७१ वर्षानंतर दिल्लीत मराठीचा डंका वाजतो आहे. या साहित्य संमेलनाची विशेष बाब म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हे साहित्य संमेलन पार पडतंय. त्यामुळे या साहित्य संमेलनात आणि मराठी सारस्वतांच्या मांदियाळीत काय चिंतन होतं ? हे पाहणं खरच औत्सुक्याचे ठरणार आहे.