“प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषतः जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारण्यांनी आमच्या स्टेजवर येऊ नये किंवा तसे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. त्यांनीही पार्टी लाईन्सवरच्या कमेंट्स करणे योग्य नाही, त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात, असं माझं मत आहे. तसेच निलम गोऱ्हे या त्या पक्षात होत्या, त्या पक्षामध्ये काय चालतं होतं, मला माहित नाही..” असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.
नुकतेच दिल्लीत २८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडले. त्यामध्ये साहित्यिकांच्या जुगलबंदीपेक्षा राजकीय नेत्यांच्या वादांनीच हे संमेलन प्रचंड गाजले. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सिडीजबाबतच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यासंपूर्ण वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही..!
या नावाचे एक चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात बोलताना शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. निलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केल्यानंतर आता त्यात राजकीय वातावरण शांत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. खासदार संजय राऊत यांनीही तुम्ही किती गाड्या दिल्या? त्याच्या पावत्या पाठवा, असे म्हणत निलम गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच सुषमा अंधारे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.