राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ५ एप्रिल रोजी वाराणसीच्या चार दिवसीय दौऱ्यावर असताना एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले,जातीच्या बंधनातून उठून माळेप्रमाणे एकजूट व्हा. हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती, समाज एकत्र आले पाहिजेत. ही संघाची दृष्टी आहे. संघाचा अर्थ सर्वांना मदत करणे आणि युवाशक्तीला योग्य दिशा देणे, असा आहे,” उत्तर प्रदेशातील ‘आयआयटी बीएचयू’च्या विद्यार्थ्यांशी सरसंघचालकांनी शनिवारी संवाद साधला.
दरम्यान, त्यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. ‘आयआयटी बीएचयू’च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरसंघचालकांनी विद्यार्थ्यांना संघाविषयी प्रश्न विचारले. त्यावर विद्यार्थी म्हणाले, “संघ म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार करणे आणि सनातनचे रक्षण करणे आहे. आता संघाच्या उद्देशाविषयी जेंव्हा मुलांनी प्रश्न विचारला तेंव्हा डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले की, “संघ संघटनेचा उद्देश हिंदू धर्म मजबूत करणे, आणि हिंदुत्वाची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवणे आहे.”
यादरम्यान उपस्थित १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सरसंघचालकांसमोर योगासने आणि खेळांची प्रात्यक्षिके दाखविली. तसेच वैदिक मंत्रांचे पठणदेखील केले. तरुणांनी उत्साहात केलेल्या या खेळांच्या प्रात्यक्षिकांनी आणि वैदिक मंत्रांच्या पठाणांनी विशेष लक्ष वेधून घेतले.