राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात तीन ठिकाणी एआय केंद्रे उभारणार आहेत. एआय केंद्र राज्यातील मुख्य शहरांपैकी असलेल्या मुंबई, पुणे आणि नागपूर ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासंबंधित महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात एक सामंजस्य करार देखील झाला आहे. हा करार १५ एप्रिल रोजी झाला आहे.
या करारावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, IBM इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल, मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या भागीदारीचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे हा आहे.
या करारानुसार, राज्यातील तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती करण्यात येणार असून, मुंबई येथे भौगोलिक विश्लेषण, पुणे येथे न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधा तसेच नागपूरमध्ये प्रगत AI संशोधन आणि MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.
याद्वारे AI-सक्षम व्हर्च्युअल सहाय्यक आणि एजेन्टिक AI च्या मदतीने सरकारी सेवा अधिक सोप्या, वेगवान आणि वैयक्तिक करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या डेटावर तयार झालेल्या AI मॉडेल्सवर शासनाचे हक्क राहतील, यामुळे या तंत्रज्ञानावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे.