जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सध्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मिडीयावर एक पोस्टच्या माध्यमातून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि यासंदर्भात सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
आपल्या पोस्ट मध्ये राज ठाकरे म्हणाले की ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला. ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ. या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे. केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे. पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी, असंही राज ठाकरे म्हणाले.
https://x.com/RajThackeray/status/1914862955042054273?t=jk8WGHy4KjVE6I9jArCMrw&s=19
हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये. आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच यावर कठोर कारवाई करतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या हल्याचा तपास सुरु असून चार हल्लेखोरांची ओळख देखील पटली आहे. तसेच या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशवादी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला कसे आणि कधी प्रत्युत्तर देते ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.