चौंडी (अहिल्यानगर) | ६ मे २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चौंडी येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एकूण ११ महत्त्वाचे निर्णय घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य मंत्री या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत घेतलेले निर्णय समाजातील विविध घटकांना सक्षम बनविणारे आणि ऐतिहासिक वारसा जपणारे ठरले. विशेषतः अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना मंजूर करण्यात आल्या.
महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे:
अहिल्यादेवी होळकर यांच्यावर बहुभाषिक चित्रपट – त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती शासनाच्या माध्यमातून होणार असून, त्यासाठी आवश्यक निधी अर्थसंकल्पातून उपलब्ध केला जाणार आहे.
आदिशक्ती अभियान – महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०.५० कोटींच्या निधीने अभियान राबविले जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येणार.
‘यशवंत विद्यार्थी योजना’ – धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळांत शिक्षणाची संधी, राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने योजना.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी वसतिगृह योजना – मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या धनगर विद्यार्थ्यांसाठी विविध जिल्ह्यांत वसतीगृहांची निर्मिती.
जलसंपत्तींचे जतन – अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, तलावांचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणासाठी ७५ कोटींचा निधी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – अहिल्यानगर येथे ४८५.०८ कोटींच्या खर्चाने नवीन महाविद्यालय व ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय उभारले जाणार.
मंदिर विकास आराखडे – राज्यातील विविध प्रमुख देवस्थानांच्या जिर्णोद्धार व विकासासाठी एकूण ५५०३.६९ कोटींचा आराखडा तयार.
महिलांसाठी नवीन आयटीआय – अहिल्यानगर येथे मुली व महिलांसाठी खास आयटीआय सुरु करण्यात येणार.
राहुरीत उच्चस्तरीय न्यायालय – जिल्ह्यातील नागरिकांना न्यायप्रणालीची सुविधा मिळावी यासाठी नवा न्यायालय स्थापन होणार.
मिशन महाग्रामचा कालावधी वाढवला – ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन अंतर्गत मिशन महाग्राम २०२८ पर्यंत सुरू राहील.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण – कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी २०२५ चा अध्यादेश जारी करण्याचा निर्णय.
या निर्णयांमुळे चौंडीतील मंत्रिमंडळ बैठक राज्याच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा ठरली आहे. समाजसुधारणा, शिक्षण, धर्मस्थळांचा विकास आणि महिलांचे सशक्तीकरण यासारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रांना या निर्णयांनी नवी दिशा आणि गती मिळणार आहे.