७ मे २०२५ रोजी भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेद्वारे पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तात्काळ आणि अचूक हल्ले केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे भारतीय संरक्षण यंत्रणांना अत्याधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शत्रूच्या हालचालींचे अचूक निरीक्षण आणि वेळेवर प्रतिसाद देणे शक्य झाले. पण या महत्वाकांक्षी ऑपरेशनमध्ये इस्त्रोसह आणखी कोणकोणत्या सरकारी आणि खासगी संस्थांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे? याच गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.
1. ISRO चे योगदान
ऑपरेशन सिंदूरमध्ये ISRO च्या उपग्रहांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उपग्रहांनी पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र आणि अन्य हालचालींवर अचूक लक्ष ठेवून भारतीय सैन्याला महत्त्वाची माहिती दिली.ज्यामुळे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांना त्वरित प्रतिसाद देणे शक्य झाले. या ऑपरेशनमध्ये ६०० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले, पाकिस्तानकडून येणाऱ्या हवाई हल्ल्यांना थांबवण्यासाठी भारताची स्वदेशी ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणाली आणि ‘आकाशतीर’ नियंत्रण प्रणालीच्या मदतीने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. ही प्रणाली उपग्रहांकडून मिळणाऱ्या रिअल-टाइम (क्षणाक्षणाला मिळणाऱ्या) माहितीवर काम करत होती. त्यामुळे काहीही नुकसान होण्यापूर्वी काही सेकंदांतच धोका ओळखून त्यावर लगेच कारवाई करता येत होती. या महत्वाच्या प्रणालींमुळे शत्रूच्या हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देणे शक्य झाले.
यासंदर्भात बोलत असताना ११ मे रोजी इंफाळमध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात इस्रो प्रमुख व्ही.एन. नारायण यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रोचे किमान १० उपग्रह सतत कार्यरत होते. या सर्व भारतीय उपग्रहांनी अचूकपणे काम केले. सुरुवातीला आमच्याकडे ३६ ते ७२ सेंटीमीटर रिझोल्यूशन असलेले कॅमेरे होते. पण आता भारताकडे चंद्रावरही “हाय रिझोल्यूशन कॅमेरा” असून तो जगातील सर्वोत्तम कॅमेरा आहे. तसेच, आमच्याकडे असे कॅमेरेही आहेत जे २६ सेंटीमीटरपर्यंत स्पष्ट चित्रे दाखवू शकतात.
"पाकिस्तान के साथ हाल ही में सीमा पर तनाव के दौरान भारत के उपग्रहों ने अच्छा काम किया।"
– ISRO के अध्यक्ष वी नारायणन pic.twitter.com/Gh28fW6BOw
— सनातनी हिन्दू राकेश (मोदी का परिवार) (@Modified_Hindu9) May 15, 2025
खरतर ही फक्त सुरुवात आहे. सरकारने पुढील ५ वर्षांत १०० ते १५० नवीन उपग्रह पाठवण्याची योजना आखली आहे. त्यापैकी ५२ उपग्रह खास देखरेख (गुप्तचर) करण्यासाठी असतील. हे उपग्रह भारताच्या ७,००० किमी लांब समुद्रकिनाऱ्याची आणि सीमांची २४ तास नजर ठेवतील. या उपग्रहांपैकी सुमारे निम्मे उपग्रह खाजगी कंपन्यांच्या मदतीने तयार केले जातील. त्यामुळे ते वेगाने तयार होतील आणि अधिक स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाईल.
2.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आणि इंटेलिजन्स एजन्सीचे योगदान
ऑपरेशन सिंदूरची योजना आणि अंमलबजावणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) यांसारख्या इंटेलिजन्स एजन्सींशी समन्वय साधून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची माहिती गोळा केली आणि त्यावर आधारित लक्ष्य निश्चित केले.
3.खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे योगदान
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय खासगी कंपन्यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. Tata Advanced Systems, Adani Elbit, Solar Industries, ZMotion Autonomous Systems, Raphe mPhibr, आणि IdeaForge या कंपन्यांनी ड्रोन आणि लोहितरण म्युनिशन्स (loitering munitions) पुरवठा केला. उदाहरणच द्यायचे झाले तर Adani Elbit आणि Alpha Design Technologies यांनी संयुक्तपणे ‘SkyStriker’ ड्रोन विकसित केले, ज्यांचा वापर पाकिस्तानमधील हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला करण्यासाठी केला गेला.
4.इतर महत्त्वाच्या घटकांची भूमिका
ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (DFI) या ड्रोन तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या संस्थेनेही महत्वाचे योगदान दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरले गेलेले ड्रोन आणि उपकरणांची मागणी, दर्जा आणि वापर याचे नियोजन या फेडरेशनमार्फत करण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या संस्थेने देखील आपल्या राष्ट्रीय महामार्गांवर आपत्कालीन लँडिंग पट्टे तयार करून भारतीय हवाई दलाला अतिरिक्त रनवे उपलब्ध करून दिले
5.भविष्यातील दिशा
ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताच्या संरक्षण यंत्रणांच्या क्षमतांमध्ये वाढ झाली आहे. आगामी काळात, ISRO च्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूच्या हालचालींचे अधिक अचूक निरीक्षण आणि वेळेवर प्रतिसाद देणे शक्य होईल. यामुळे भारताच्या संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होईल.
ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर ती विज्ञान, तंत्रज्ञान, सामरिक नियोजन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होती. ISRO पासून ते खासगी ड्रोन कंपन्यांपर्यंत, गुप्तचर संस्थांपासून ते रस्ते बांधणाऱ्या NHAI पर्यंत अनेक घटकांनी एकत्र येऊन ही कारवाई यशस्वी केली. ज्यातून पुन्हा एकदा जगाला ‘आत्मनिर्भर भारत’ चे स्वरूप काय आहे? याची खऱ्या अर्थाने प्रचिती आली.