पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या सभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ (operation sindoor) च्या संदर्भात बोलत असताना भारतीयांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांच्या या आवाहनात त्यांनी १४० कोटी भारतीय नागरिकांना स्वदेशी उत्पादनांचा वापर करून भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आवाहन केले. “भारताला मोठे करणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी चीनलाही इशारा देत म्हटले की कोणीही भारताला कमकुवत समजू नये. या लेखात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा जो संदेश दिला आहे, त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते प्रभावांपर्यंत अशा विविध मुद्द्यांची सखोल माहिती घेऊया.
१.स्वदेशीचा नारा देणारे समाजसुधारक
भारतीय समाजसुधारकांनी स्वदेशीचा संदेश विविध कालखंडात दिला आहे. प्रामुख्याने भारतावर ब्रिटशांची सत्ता असताना या स्वदेशी चळवळीला अधिक चालना मिळाली. या चळवळीत लोकांना ब्रिटनमध्ये बनवलेल्या वस्तूंऐवजी भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना जागृत झाली. ज्यामुळे या काळात ब्रिटिश उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात आला यामध्ये विविध समाज सुधारकांनी स्वदेशीचा नारा दिला होता.
गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका)
गणेश वासुदेव जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारे कर्मयोगी होते. त्यांचे समाजहितासाठीचे समर्पित कार्य इतके प्रभावी होते की लोक त्यांना प्रेमाने “सार्वजनिक काका” या नावाने संबोधू लागले. सन १८७० मध्ये पुणे येथे त्यांनी औंध संस्थानचे श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली “सार्वजनिक सभा” या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या अडचणी शांतपणे आणि रचनात्मक मार्गाने मांडण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न केला. ते लोकशाही मूल्यांवर आधारलेले कार्य करत होते आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी झटत होते. याचबरोबर त्यांनी देशी उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी ‘देशी व्यापार मंडळा’चीही स्थापना केली. या मंडळामार्फत त्यांनी साबण, मेणबत्त्या अशा अनेक स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रेरणा दिली आणि स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व जनमानसात रुजवले. त्यांनी या मालाची वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, सातारा, सुरत आदी शहरांमध्ये दुकाने सुरू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. गणेश वासुदेव जोशी यांचे जीवन हे नुसते विचारांवर नव्हते, तर ते विचारांची अंमलबजावणी करणारे आणि समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे एक जिवंत उदाहरण होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देखील स्वदेशी चळवळीला महत्त्वपूर्ण चालना दिली. त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच” हे घोषवाक्य १९१६ मध्ये अहमदनगर येथील सभेत दिले होते. ज्यामुळे भारतीय जनतेत स्वराज्याच्या विचारांची जागृती झाली. स्वदेशी चळवळीच्या प्रचारासाठी टिळकांनी ‘केसरी’ या वृत्तपत्राचा वापर केला. त्यांनी ‘स्वदेशीवरील आक्षेप’ या अग्रलेखाद्वारे ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर टीका केली. त्यांच्या या लेखांमुळे जनतेत जागृती निर्माण झाली आणि स्वदेशी मालाच्या वापराला प्रोत्साहन मिळाले. स्वदेशी चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी टिळकांनी १९०६ मध्ये ‘बॉम्बे स्वदेशी सहकारी स्टोअर्स’ ची स्थापना केली. या स्टोअरमध्ये भारतीय हस्तशिल्प आणि हस्तकरघा उत्पादनांचे विक्री केंद्र उभे केले, ज्यामुळे स्थानिक उद्योगांना तर चालना मिळालीच पण या स्वदेशी चळवळीच्या प्रभावामुळे ब्रिटिशांच्या परदेशी वस्त्रांच्या विक्रीत ८०% घट झाली तसेच मँचेस्टरमधील कापड गिरण्या देखील बंद पडल्या. वास्तविक स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून टिळकांनी ‘स्वराज्य’ आणि ‘स्वदेशी’ या संकल्पनांना जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक नवा उत्साह निर्माण झाला.
महादेव गोविंद रानडे
१८९० मध्ये पुण्यात औद्योगिक परिषद आयोजित करून रानडे यांनी भारतातील औद्योगिकीकरणाच्या गरजेवर भर दिला. या परिषदेत त्यांनी कृषीप्रधान अर्थव्यवस्थेवरून औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे वळण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांच्या ‘Indian Political Economy’ या निबंधात त्यांनी शिक्षण, टपाल सेवा, टेलिग्राफ, रेल्वे, कालवे आणि विमा यांसारख्या क्षेत्रांमध्ये राज्य हस्तक्षेपाची आवश्यकता सांगितली. त्यामुळे सामाजिक राजकीय जागरूकता वाढण्यास मदत झाली तसेच स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्याने स्वदेशी वस्त्र उद्योगालाही चालना मिळाली. एकुणच या माध्यमातून स्वदेशी चळवळीला आर्थिक आधार मिळाला.
विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी स्वदेशी वस्त्र वापरण्याचा आग्रह धरला आणि परदेशी वस्त्रांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. १९०५ मध्ये पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून त्यांनी या चळवळीला प्रारंभ केला. रत्नागिरीत स्थानबद्धतेच्या काळातही सावरकरांनी स्वदेशी वस्त्रांच्या प्रचारासाठी विविध उपक्रम राबवले. ते स्वदेशी वस्त्रांची गाडी फिरवत, दुकानदारांना स्वदेशी वस्त्र विक्रीसाठी प्रेरित करत, आणि स्थानिक लोकांना स्वदेशी वस्त्रांच्या महत्त्वाबद्दल जागरूक करत होते. १९३२ मध्ये राजापुरात खादी भांडाराचे उद्घाटन करून त्यांनी स्वदेशी वस्त्रांच्या वापराला चालना दिली. या चळवळीमुळे लोकांमध्ये स्वदेशी वस्त्रांच्या वापराची आवड निर्माण झाली दूसरीकडे ब्रिटिश वस्त्रांच्या वापरात मात्र घट झाली. त्यामुळे भारतीय उद्योगांना चालना मिळाली आणि स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले.
२.चीनच्या व्यापाराला फटका तर भारताला फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या स्वदेशीच्या संदेशाचा मुख्य उद्देश भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करणे आणि चीनसारख्या देशांवर भारताची आर्थिक निर्भरता कमी करणे हा आहे. हे खाली दिलेली सुलभ मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात.
चीनकडून खरेदी कमी करण्यावर भर
भारत दरवर्षी चीनकडून 100 अब्ज डॉलर्सहून अधिक वस्तू खरेदी करतो. जर आपण चिनी वस्तू खरेदी करणे कमी केले, तर चीनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते. 2020 नंतर झालेल्या अंशतः बहिष्कारामुळेच चीनचा काही हजार कोटींचा तोटा झाला होता.
भारताला काय फायदा होणार?
भारतातील वस्तू वापरल्याने भारतातच रोजगार निर्माण होतो. जर आपण चीनमधून आलेली वस्तू न वापरता भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी केल्या, तर त्या वस्तू तयार करणाऱ्या भारतीय कामगारांना आणि उद्योजकांना रोजगार मिळेल. वाहतूक कमी असल्याने प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक कलेला आणि हस्तकलेला प्रोत्साहन मिळाल्याने संस्कृतीचे जतन होईल.आणि यामुळे भारताचे पैसे भारतातच राहतील.
चीनचा प्रभाव कमी करता येईल
चीन सातत्याने पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशांना मदत करून भारताविरुद्ध षडयंत्र रचत असतो. जर भारताने आर्थिक दृष्टीने चीनवर दबाव टाकला, तर त्यांच्या पायाभूत योजना आणि लष्करी धोरणांवर परिणाम होईल.
भारतीय उत्पादकांना चालना मिळेल
या धोरणाचा भारतातील छोट्या मोठ्या उद्योगांनाही नक्कीच फायदा होईल. जसे की खेळणी, मोबाईल पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषधांचे घटक हे चीनवर अवलंबून होते, पण आता भारतातच उत्पादन होण्यास सुरुवात झाल्याने अशा वेळी बहिष्कारामुळे मेक इन इंडिया सारख्या योजनांना गती मिळेल.
परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळेल
जर भारताने चिनी वस्तूंचा वापर कमी केला आणि भारतीय वस्तूंची मागणी वाढवली, तर Apple, Tesla यांसारख्या कंपन्या भारतात कारखाने उघडतील. त्यामुळे भारत जगाच्या पुरवठा साखळीचा (global supply chain) भाग बनू शकेल.
३. भारत आज कोणकोणत्या क्षेत्रात स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर झाला आहे?
भारताने “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. खालील प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे.
संरक्षण (Defence)
भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये सात शस्त्रागार, तीन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) युनिट्स, आणि दोन भारत-रशिया सहकार्य प्रकल्प (अमेठीतील AK-203 रायफल प्लांट आणि लखनऊतील ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुविधा) समाविष्ट आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशात 6 संरक्षण कॉरिडॉर नोड्स, आणि आदानी डिफेन्सचा कानपूरमधील दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रागार समाविष्ट आहे. या सर्व उपक्रमांमुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
सौर ऊर्जा (Solar Energy)
भारताने 2025 मध्ये 100 GW सौर ऊर्जा उत्पादन क्षमता गाठली आहे, ज्यामुळे तो जगातील सौर ऊर्जा क्षेत्रात अग्रगण्य देशांपैकी एक ठरला आहे.राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र, आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जात आहेत. याशिवाय, भारताने सौर पॅनेल उत्पादन क्षमता 60 GW पर्यंत वाढवली आहे तसेच 2030 पर्यंत 100 GW उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन उत्पादन
भारताने उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन (PLI) योजनेअंतर्गत स्मार्टफोन उत्पादनात मोठी वाढ केली आहे.2014 मध्ये 78% असलेल्या स्थानिक उत्पादनाचा हिस्सा 2025 मध्ये 99% पर्यंत पोहोचला आहे. शिवाय Apple सारख्या जागतिक ब्रँड्सने भारतात आपले उत्पादन वाढवले आहे, ज्यामुळे भारत iPhone उत्पादनात चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा केंद्र बनला आहे.
औषधनिर्माण (Pharmaceuticals)
भारताने औषधनिर्माण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशातील औषधनिर्माण उद्योग जागतिक स्तरावर “फार्मा कॅपिटल” म्हणून ओळखला जातो.भारताने कोविड-19 महामारीच्या वेळी लस उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे स्थानिक पातळीवरच तयार केली.
कृषी आणि जैविक शेती (Agriculture and Organic Farming)
सिक्कीम राज्याने 2016 मध्ये 100% जैविक शेती धोरण लागू केले आणि ते जगातील पहिले 100% जैविक राज्य बनले. याशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि राजस्थान या राज्यांमध्येही सौर ऊर्जा आधारित सिंचन प्रकल्प राबवले जात आहेत, ज्यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे.
बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology)
भारताचा बायोटेक्नॉलॉजी उद्योग 2022 मध्ये \$80 अब्ज मूल्याचा होता आणि 2025 पर्यंत \$150 अब्ज आणि 2030 पर्यंत \$300 अब्ज होण्याचा अंदाज आहे. Bio-RIDE योजनेअंतर्गत जैविक संशोधन, उद्योजकता, आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे.
नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा आत्मनिर्भरता (Renewable Energy and Energy Self-Reliance)
सध्या भारताने 2025 मध्ये 100 GW सौर ऊर्जा उत्पादन क्षमता गाठली असून 2047 पर्यंत 100 GW आण्विक ऊर्जा क्षमता वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच देशातील महत्त्वाच्या खनिजांसाठी 25 वस्तूंवर मूलभूत कस्टम ड्युटीमध्ये 100% सूट दिली आहे, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढली आहे.
एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वदेशीचा संदेश हा भारताच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटी भारताला ‘मोठे करणे’ ही संकल्पना केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर हा केवळ देशभक्तीचा पुरावा नसून, तो देशाच्या भविष्यातील आर्थिक शक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचा आधार आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाने सक्रिय योगदान देणे ही काळाची गरज आहे.
PM मोदी जी का देशवासियों से खुला आह्वान!
– विदेशी सामानों का पूर्ण बहिष्कार करो
– दुकानदार विदेशी सामान न बेचने की शपथ लें
– छोटी आंख वाले गणेश जी भी विदेशी आ गए हैंअगर भारत को बचाना है, भारत को बढ़ाना है तो ऑपरेशन सिन्दूर सिर्फ सैनिकों की जिम्मेदारी नहीं है
बल्कि
देश के 140… pic.twitter.com/elMQlpNPuc— MUKESH DADHICH (@m_dadheech) May 27, 2025