हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारत भूमीत वेगवेगळ्या परंपरा, श्रद्धा आणि धार्मिक आस्था आहेत. त्यात आदिवासी समाजाचा वाटा महत्त्वाचा आहे. आदिवासी हे भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत आले आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी जीवनशैली, पूजा-पद्धती, श्रद्धा आणि आचारधर्म टिकवून ठेवले आहेत. मात्र गेल्या काही दशकांत काही आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणाचे (Conversion) प्रमाण वाढले आहे. विशेषतः जेव्हा हे धर्मांतरण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली, आमिषांच्या माध्यमातून किंवा गरिबीचा फायदा घेऊन होते, तेव्हा तो एक गंभीर नैतिक प्रश्न बनतो. कुणाच्याही धार्मिक श्रद्धेचा आदर राखणे आणि धर्म स्वातंत्र्याचे संविधानिक मूल्य मानणे अत्यावश्यक आहे. परंतु धर्मांतर जर मोह, फसवणूक, आर्थिक लाभ, शिक्षण वा आरोग्याच्या नावाखाली होत असेल, तर त्याची नैतिकता आणि हेतू दोन्ही प्रश्नांकित होतात. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे . यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ची (RSS) नेमकी काय भूमिका आहे. सविस्तर जाणून घेऊयात.
गुरुवारी (५ जून) रोजी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोप सोहळा संपन्न झाला. रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी समीरकुमार महांती प्रामुख्याने उपस्थित होते आणि परदेशात विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना संरसंघ चालकांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. त्यामध्ये त्यांनी बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरणावर देखील भाष्य केले. वस्तुतः अशा प्रकारचे धर्मांतरण संपूर्ण भारतभर घडून आणले जात असल्याची अनेक उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यातही विशेषतः अशा प्रकारच्या धर्मांतरणाला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात बळी पडला असल्याचे दिसून येते.
१.धर्मांतरणावर सरसंघचालकांचे विचार
सरसंघचालकांच्या मते आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणाचा मुद्दा गंभीर आहे. पण त्याआधी ते म्हणाले की विकास आणि पर्यावरण याचा विरोध का व्हावा. हे दोन्ही घटक एकत्र चालू शकत नाहीत का? चालू शकतात, पण एकतेचा विचार मनात ठेवून सर्व योजना बनायला हवी. आदिवासी समुदाय आपलाच समाज आहे. त्याधी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम यांनी आदिवासींच्या समस्यावर आरएसएस ने लक्ष घालावे अशी विनंती केली होती त्यावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की तुम्ही आदिवासी संदर्भात ज्या बाबतीत संघाची मदत मागितली, त्याबाबत आपल्या सर्वांना याचा विचार करावा लागेल. आम्ही तर करतच आहोत. आमची एक पद्धत आहे. त्याद्वारे हा विषय शासनापर्यंत पोहोचून जाईल. त्यामुळे शासन आपले काम करेल, तिथे थोडासा वेळ लागतो. पण आम्ही म्हणतो की, खरी ताकद समाजाची आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून आमच्या स्वयंसेवकांनी काम केलेले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की धर्मांतरणाचा विषय आहे. मनापासून जर कुणी पुजेची पद्धती बदलत असेल तर त्याला कुणीच आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही. मात्र विविध आमिषे दाखवून व जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच आहे. धर्मांतरण ही हिंसाच आहे. आम्ही त्याचे कधीच समर्थन केलेले नाही. तसेच जे लोभ आणि जबरदस्तीने गेले होते ते जर परत घरवापसी करणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे. कारण इट इज करेक्शन.
याधीही सरसंघचालकांनी धर्म या विषयावर अनेकदा मार्गदर्शन केले आहे. मागच्याच महिन्यात जयपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की जगाला धर्म शिकवणे हे भारताचे कर्तव्य आहे. धर्माच्या माध्यमातूनच मानवतेची उन्नती होणे शक्य आहे. विश्वकल्याण हा आमचा प्रमुख धर्म आहे. या शिवाय अमरावती येथील महानुभाव आश्रमाच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना भागवत म्हणाले होते की धर्म महत्त्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने शिकवला गेला पाहिजे. धर्माचे अयोग्य आणि अपूर्ण ज्ञान अधर्माकडे घेऊन जाते. सनातन धर्माची व्याख्या करताना ते म्हणाले होते की धर्म हा सदैव अस्तित्वात आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यानुसार चालते आणि म्हणूनच त्याला सनातन म्हणतात, सृष्टीच्या आरंभापासून शेवटपर्यंतची संहिता म्हणजे सनातन धर्म. धर्म हा सत्याचा आधार आहे. त्यामुळे धर्माचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. संप्रदाय कधीही लढायला शिकवत नाही, तो समाजाला नेहमीच एकत्र आणतो. त्यातून सत्य, अहिंसा, शांती आणि समतेची भावना जागृत होते.
२.आदिवासी समाजावर धर्मांतरणाचा गंभीर प्रभाव
भारतातील आदिवासी समाज हा खूप जुना असून, त्यांची स्वतःची वेगळी संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा आहेत. प्रामुख्याने ते निसर्गपूजक असतात. म्हणजे झाडं, डोंगर, नदी, सूर्य अशा निसर्गात ते देव पाहतात. पण ब्रिटिश काळात आणि नंतरही, काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शिक्षण, आरोग्य आणि मदतीच्या नावाखाली आदिवासी भागांत काम सुरू केले. त्यावेळी काही ठिकाणी त्यांचे धर्मांतरण कडून आणले गेले. पुढे यावरून वाद निर्माण झाल्याने काही राज्य सरकारांनी धर्मांतरण थांबवण्यासाठी कायदे केले. मात्र तरीसुद्धा आजही काही ठिकाणी गुपचूप धर्म बदलवले जात असल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात. आदिवासींचे हे धर्मांतरण होण्यामागच्या कारणांविषयी बोलायचे झाले तर यामागे प्रामुख्याने चार कारणे सांगता येतील.
१.गरिबी – अनेक आदिवासी खूप गरीब असतात. त्यांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि अन्न यासाठी मदतीची गरज असते. काही संस्था या गरजांचा फायदा घेतात आणि धर्म बदलायला सांगतात.
२.अशिक्षण आणि अंधश्रद्धा – शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा आदिवासी लोकांना धर्म, अधिकार आणि कायद्याची माहिती नसते. त्यामुळे ते सहजपणे फसवले जातात.
३.एकटेपणाची भावना– मुख्य समाजाकडून मिळणाऱ्या तिरस्कारामुळे काही आदिवासी लोक नवीन धर्मात सन्मान आणि आपलेपणा मिळेल, या आशेने धर्म बदलतात.
४.फसवणूक आणि आमिष – कधी कधी त्यांना नोकरी, पैसा, उपचार किंवा शिक्षणाचे आमिष दाखवले जाते आणि मग धर्म बदलायला लावले जाते
३. अमिषे दाखवून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण
भारतातील विविध राज्यांमध्ये, प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये, बळजबरीने धर्मांतर आणि संबंधित गुन्हेगारीची अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणाचा वापर करून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे आरोप आहेत. २०२५ मध्ये अशा तीन घटना समोर आल्या आहेत. इंदूरमध्ये नऊशाद अली खान उर्फ अमान याला बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने धर्मांतरासाठी अटक करण्यात आली. तर वाराणसीमध्ये श्रद्धा सिंगने विवाहानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याबद्दल पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. अजमेरमध्ये हकीम कुरेशीसह १३ आरोपींना अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराच्या आरोपाखाली अटक झाली. तर २०२२ मध्ये मेरठमध्ये सुमारे ४०० लोकांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या समोर आलेली उदाहरणे ही केवळ काही ठराविक प्रकरणे आहेत. मात्र या घटनांवरून असे स्पष्ट होते की देशभरात अशा प्रकारांचे प्रमाण खूप मोठे आहे.
त्याच पार्श्वभूमीवर शेवटी भाषणाच्या अखेरीस मोहन भागवत यांनीही स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारचे धर्मांतर ही एकप्रकारची हिंसा आहे, आणि आदिवासी हेच आपल्या संस्कृतीचे मूळ आहेत. त्यामुळे धर्मस्वातंत्र्य जपतानाच आदिवासी समाजाच्या सन्मान, शिक्षण आणि सशक्तीकरणावर लक्ष देणे हीच खरी गरज आहे.
कार्यकर्ता विकास वर्ग – द्वितीय समापन समारोह ज्येष्ठ शुक्ल दशमी गुरुवार युगाब्द 5127 https://t.co/bAsJIHKpGl
— RSS (@RSSorg) June 5, 2025