RSS Contribution in Natural Disasters: नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रशासनाला सहकार्य करत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्थातच देशावर कोणतेही संकट आले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशाच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असतो हे आजवरच्या अनेक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आज विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कसे कार्य केले आहे, याची सविस्तर माहिती आजच्या लेखातून घेऊयात.
कोरोना महामारीत राष्ट्रीय स्वयंसेवकांनी कशी केली देशाची मदत:
-भारतात जेव्हा नुकताच कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी स्वयंसेवकांनी कोव्हिडमध्ये जागरूकता पसरवण्याच्या सरकारी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता मोहीम राबवण्यास आणि गरजूंना अन्न पुरवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जेव्हा देशात कोरोनाने गंभीर रूप धारण केले आणि सर्वत्र हाहाकार माजला तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी झोकून देऊन विविध स्तरातून समाजसेवा केली. लाॅकडाऊनमध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना स्वयंसेवकांनी जेवणाचे पॅकेट्स, राशनचे वाटप केले. स्वयंसेवकांच्या मदतीने देशभरामध्ये विविध ठिकाणी आयसोलेशन सेंटर स्थापन करण्यात येत होते. तसेच स्वयंसेवक लसीकरण केंद्रांना मदत करत होते. संघाच्या स्वयंसेवकांनी प्लाझ्मा दान केल्या होत्या. तसेच संघाच्या स्वयंसेवकांकडून देशभरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक हजारो गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर, कॉन्सन्ट्रेटर आणि औषधे पुरवत होते. विशेष म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी मृतांच्या कुंटुंबियांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासही मदत केली आहे.
-२०२१ मध्ये मध्य प्रदेशातील भिंडमधील स्वयंसेवकांचे मनाला भावणारे काही फोटो व्हायरल होत होते. या फोटोत संघाचे स्वयंसेवक कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करताना पाहायला मिळाले होते.
स्मशानभूमीतील साफसफाई करतानाही संघाचे कार्यकर्ते पाहायला मिळाले होते.
-कोरोना काळात जेव्हा रूग्णांसाठी बेड कमी पडत होते तेव्हा कर्नाटकमधील कोलार येथील २० वर्षांपासून बंद असलेले भारत गोल्ड माइन्स लिमिटेड रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा ८०० खाटांच्या रुग्णालयातील कचरा, तण आणि कोळीचे जाळे साफ करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. सुमारे ३०० स्वयंसेवकांनी हे सर्व काम पार पाडले होते.
एकूणच संघाच्या स्वयंसेवकांनी अन्न, स्वच्छता, साहित्य वाटप, रक्तदानासारख्या उपक्रमांचे आयोजन, आरोग्य तपासणी, औषध वितरण आणि समुपदेशन यांसारखे उपक्रम राबवत कोरोनाच्या लढाईत जीवाची पर्वा न समाजसेवा केली. अर्थातच कोरोनाविरोधातील लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रभागी आहेत.
2013 मध्ये केदारनाथ येथील नैसर्गिक आपत्तीत स्वयंसेवकांनी कशी केली होती मदत:
जून २०१३ मध्ये उत्तराखंड राज्यातील केदारनाथ आणि केदारनाथ सभोवतालच्या परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाल्यामुळे नद्यांना पुर आलो होता. त्यामुळे एक भीषण नैसर्गिक आपत्ती उद्भवली होती. ही आपत्ती भारतातील सर्वात भयानक नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळपास हजारो लोक मृत्युमुखी पडले होते, गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली होती. लाखो लोक या पुरामध्ये अडकून पडले होते. अशा परिस्थीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. कारण नैसर्गिक आपत्तीच प्रशिक्षण घेतलेले हजारो स्वयंसेवक केदारनाथ आणि आसपासच्या भागात मदतीसाठी गेले होते. विशेष म्हणजे पुरामुळे अनेक रस्ते बंद होते तरीही संघाच्या स्वयंसेवकांनी जीवानावश्यक साहित्य पाठीवर घेऊन चालत डोंगर चढून त्या ठिकाणी पोहोचून पिडीतांना मदत केली होती. तसेच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात स्वयंसेवकांनी मदत केली होती. लहान मुलांना तर पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले होते. तसेच ज्यांना प्राथमिक उपचाराची गरज आहे. अशा लोकांना प्राथमिक उपचार मिळवून देण्यात आणि गरजूंना अन्न व पाणी देण्यात स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. दुर्घटने नंतर सार्वजनिक सुविधांची पुनर्बांधणी करताना स्थानिक प्रशासन, पोलिस, आणि लष्कर यांच्यासोबत समन्वय ठेवून स्वयंसेवकांनी पुनर्बांधणीच्या कामातही मदत केली होती.
-या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘उत्तरांचल दैवी आपदा पीठित सहायता समिती’ या नवीन मंचाची स्थापना केली होती. या समितीद्वारे केदारनाथ व आसपासच्या लोकांच्या पुनर्वसनासाठी देशभरातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
ओडिशामधील बालासोरमधील रेल्वे दुर्घटनेत स्वयंसेवकांनी देवदूतासारखी केली मदत:
ओडिशामधील बालासोरमधील महानगा गावाजवळ 2023 मध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली होती. जिथे ही रेल्वे दुर्घटना घडली तिथल्या गावात अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहत होते. त्यामुळे दुर्घटनेची माहिती मिळताच स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी पोहचले आणि स्थानिक लोकांची मदत घेत त्यांनी ट्रेनचे दरवाजे उघडले आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि जखमींना स्वतःच्या वाहनांमधून रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली होती.विशेष म्हणजे पोलिस आणि इतर बचाव पथके येण्यापूर्वीच लवकरात लवकर त्यांनी बचाव कार्य सुरू केले होते त्यामुळे अनेक जखमींना जीवदान मिळाले होते.
-रूग्णालयात नेण्यात आलेल्या अनेक जखमींना रक्ताची आवश्यकता होती. तेव्हा रक्ताच्या आवश्यकतेचा एक व्हॉट्सअॅप संदेश स्वयंसेवकांपर्यंत पोहचला आणि हजारोंच्या संख्येन रक्तदान करण्यासाठी स्वयंसेवक आणि स्थानिक लोक रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात रक्तदान करणाऱ्या स्वयंसेवकांची गर्दी पाहून त्यावेळी डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले होते.
– ही रेल्वे दुर्घटना रात्रीच्या वेळी घडली होती. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सकाळी प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी आणि बचाव कर्मचाऱ्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यास देखील स्वयंसेवक मदत करत होते.
चरखी दादरी विमान अपघात आणि स्वयंसेवकांची कामगिरी:
चरखी दादरी विमान अपघात हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक मानला जातो. १२ नोव्हेंबर १९९६ रोजी हरियाणामधील चरखी दादरी गावाजवळ दिल्लीहून सौदी अरेबिया कडे जाणाऱ्या आणि कझाकस्तानमधील चिमकेन्टहून दिल्लीकडे येणाऱ्या दोन विमानांची हवेतच समोरासमोर धडक झाली होती. या दोन्ही विमानांमध्ये एकूण ३४९ प्रवासी होते आणि या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातस्थळी पासपोर्ट्स, अन्नाचे पुडे, चपला, खेळणी, उघडलेली सुटकेसेस आणि विमानाच्या सीट्स लांब लांब पर्यंत विखुरलेल्या अवस्थेत होते. जिथे अपघात झाला तिथल आसपासच्या परिसरात प्रवाशांच्या मृतदेहाचे तुकडे इकडे तिकडे विखुरले होते. या अपघातातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला होता.
आरएसएसच्या स्वयंसेवकांनी अपघातानंतर तात्काळ प्रवाशांच्या शरीराचे अवशेष गोळा करण्यास मदत केली. तसेच प्रवाशांच्या नातेवाईकांना रुग्णालयांशी समन्वय साधून मृतदेह ओळखण्यास मदत केली. मृतांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचे महत्वपूर्ण कामही स्वयंसेवकांनी यावेळी केले होते. तसेच मृतांच्या नातेवाईकांच्या चहा, पाण्याची सुविधासुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी केली होती. ओळख न पटलेल्या मृतदेहांसाठी शवपेट्या तयार करण्याचे आणि कफन व्यवस्थापन करण्याचे कामही स्वयंसेवकांनी केले. या दुर्घटनेत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी तात्काळ केलीली मदत ही खूप मोलाची ठरली होती.
वायनाड भूस्खलन घटना:
केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलै रोजी भूस्खलन झाले होते. या घटनेत सुमारे ५० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली होती. या घटनेत शेकडा लोक मारले गेले होते. तसेच अनेक लोक बेपत्ता झाले होते या बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि केरळ पोलीस प्रशासन यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा प्रयत्न करत होते. तसेच बचावलेल्या लोकांवरही उपचार सुरू करण्यातही स्वयंसेवक महत्वपूर्ण भूमिका बजावत होते.
बचावकार्यासोबतच संघाचे स्वयंसेवक बेघर लोकांसाठी जेवण आणि निवास व्यवस्था देखील करत होते. मृतांच्या अंत्यसंस्कारात देखील सेवा होते. या वेळी संघाकडून वायनाडमध्ये अनेक ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली होती.
2018 चा केरळचा पूर:
२० ऑगस्ट २०१८ रोजी जेव्हा केरळमध्ये पूर आला होता तेव्हा केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी बचाव कार्याच्या टीमसह लोकांना पूरातून बाहेर काढण्यात मदत केली होती. तसेच सरकारने पूरग्रस्तांना पाठवलेले मदत साहित्य पूरग्रस्तांवा पोहचवण्यात स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली
-२०१५ मध्ये जेव्हा बिहारमध्ये पूर आला होते तेव्हा संघाचे ११,००० स्वयंसेवक पूरग्रस्तांना मदत करत होते. पूरग्रस्तांना अन्नाचे पॅकेट आणि औषधे दिली जात होती.
–दाना चक्रिवादळानंतर घरांचे पुनर्वसन करण्यात स्वयंसेवकांची महत्वपूर्ण भूमिका:
२०२४ मध्ये जेव्हा दाना चक्रिवादळाचा ओडिशाला फटका बसला होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेले कार्य महत्वपूर्ण ठरले आहे. कारण स्वयंसेवकांनी चक्रिवादळामुळे पडलेली झाडे उचललण्यास प्रशासनाला मदत केली. तसेच ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा लोकांची घरे साफ करण्यात आणि घरांचे पुनर्वसन करण्यात मदत केली होती. मदत केंद्रास आश्रय घेतलेल्या लोकांना अन्न पुरवठा, स्वच्छ पाणी पुरविण्यातही मदत करण्यात केली होती.
गुजरातच्या भूकंपानंतर पुनर्वसनासाठी संघाची महत्वपूर्ण भूमिका:
२६ जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये विनाशकारी भूकंप झाला होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यात मदत केली. मृतांवर अंत्यसंस्कार केले. या भूकंपात बेघर झालेल्यांना मोफत अन्न पुरवण्यासाठी स्वयंपाकघरे स्थापन केली. तसेच आरएसएसने गावांच्या पुनर्वसनासाठी गावांचा एक समूह पुनर्बांधणी केली.
दरम्यान,आतापर्यंत देशात जेव्हा जेव्हा छोटी मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मृतदेह उचलण्यापासून ते मृतांच्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यापर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे हे स्पष्ट होते. संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली संघाची बांधिलकी यातून अधोरेखीत होते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत लोकांच्या स्मृतीत खोलवर रूजत आहे.