ABVP अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ही फक्त भारतातीलच नाही तर जगातील एक प्रतिष्ठित विद्यार्थी संघटना आहे. राष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी असलेली ही संघटना गेल्या अनेक दशकांपासून शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. या लेखात आपण ABVP ची स्थापना, इतिहास उद्दिष्टे, ध्येय, रचना, कार्यपद्धत आणि संघटनेच्या देशातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणार आहोत.
1. स्थापना आणि इतिहास
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ही भारतातील एक प्रभावी आणि मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1948 साली झाली आणि ती अधिकृतपणे 9 जुलै 1949 रोजी नोंदणीकृत झाली. ABVP ची स्थापना शिक्षण सुधारणा, विद्यार्थी हितसंपादन आणि राष्ट्रभक्ती यासाठी झाली होती. या संघटनेचे प्रमुख संस्थापक म्हणून बलराज मधोक यांचे नाव घेतले जाते. ते एक विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ होते, आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राष्ट्रीय परिवर्तन घडवावे असा उद्देश ठेवला होता.
ABVP च्या विस्तारामध्ये आणि घडणामध्ये यशवंतराव केळकर यांचे मोठे योगदान मानले जाते. 1958 साली त्यांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारली आणि केवळ काही शहरांपुरती मर्यादित असलेली ही संघटना देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ABVP ने शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांचे हक्क, आणि राष्ट्राभिमान यावर लक्ष केंद्रित केले. यशवंतराव केळकर यांना ABVP चा “वास्तविक शिल्पकार” (Architect) मानले जाते कारण त्यांनी संघटनेला मजबूत विचारधारा, संघटन रचना आणि देशव्यापी दिशा दिली.
2.उद्दिष्टे आणि ध्येय
ABVP ची स्थापना खालील उद्दिष्टाने झाली:
ABVP चा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि युवा समाजाला राष्ट्र पुनर्निर्मितीत योगदान देण्यासाठी प्रेरित करणे आहे
1948–49 मध्ये त्यांनी विद्यापीठांमध्ये साम्यवादाचा प्रभाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले .
ABVP हे “National Reconstruction” च्या तत्त्वावर कार्य करते, ज्यामध्ये शैक्षणिक सुधारणा, विद्यार्थी नेतृत्व, आणि राष्ट्रप्रेम यांचा समावेश आहे
3. संघटनेची रचना आणि कार्यपद्धती
रचना
ही संघटना प्रामुख्याने शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. जिचा प्रेरणा स्रोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आहे. मात्र असे असले तरीही ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा संघटनांची “student wing” मानली जात नाही, संघटनेचे स्वतःचे कार्यकारी मंडळ, शाखा आणि स्वतंत्र धोरणे आहेत. ही एक सर्वसमावेशक आणि लोकतांत्रिक संघटना असल्याने तिचे निर्णय कॉलेज, महाविद्यालय, जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्रीय अशा चार स्तरांवर घेतले जातात.
कार्यपद्धती
ABVP चा असा विश्वास आहे की विद्यार्थी हा फक्त उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे. म्हणूनच शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विचार आणि संस्कार देणे आवश्यक आहे. अभाविप फक्त विद्यार्थी हितासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या हितासाठीही विविध कार्यक्रम राबवते, जे पुढे सामाजिक चळवळींचा भाग होतात. या उपक्रमांमुळे अनेक कार्यकर्त्यांना सामाजिक जीवन आणि आयुष्य जगण्याची नवीन दृष्टी प्राप्त होते.
4. ABVP चे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान
शैक्षणिक योगदान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) गेल्या ७४ वर्षांपासून विद्यार्थी जीवनाशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. आज अभाविप प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करत असून, विविध उपक्रम राबवत आहे.
मुख्य उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
Students for Development– पर्यावरण विषयासाठी
Students for Seva – सेवा क्षेत्रासाठी
राष्ट्रीय कलामंच – कला (गायन, वादन, नृत्य, नाट्य) क्षेत्रासाठी
जिज्ञासा– आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
Mede-Avision – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी
Pharmavision – औषधनिर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी
Agrivision – कृषी शिक्षण घेणाऱ्यांसाठी
तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य – इंजिनिअरिंग व तंत्रशिक्षण क्षेत्रासाठी
जनजाती विद्यार्थी कार्य – आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी
SHODH – संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
Think India – केंद्रीय शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी
WOSY (World Organisation of Students and Youth) – आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी
Indigenous– खासगी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थ्यांसाठी केलेली आंदोलने
शिक्षण व्यवसायीकरण, शुल्कवाढ, अपर्याप्त आधारभूत सुविधांवरील आवाज उठवताना ABVPने अनेक वेळा आंदोलन केले आहेत.
2020 मध्ये कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन पडल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार गेले होते. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) शिक्षण संस्थांनी एकरकमी शैक्षणिक शुल्क मागणे अन्यायकारक आहे, असे सांगून त्याला विरोध केला. शासन आणि शिक्षण संस्था यांचे लक्ष या समस्येकडे जावे. या हेतूने त्यांनी “भीक मागो आंदोलन” केले होते.
14 फेब्रुवारी 2025 रोजी ABVP ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागातील अडचणी, वसतिगृहातील समस्या, भोजन गुणवत्ता आणि सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर ‘महाआक्रोश मोर्चा’ काढला होता. त्यानंतर प्रशासनाने काही मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घेतल्याचे नमूद केले होते.
22 मार्च 2025 रोजी नवी मुंबई येथील एक महाविद्यालयात एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळासंबंधी ABVP ने तातडीने प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी केली. तसेच, विरोध केला नसल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
सामाजिक योगदान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ही केवळ एक विद्यार्थी संघटना नसून, ती सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करणारी व्यापक चळवळ आहे. शिक्षणाच्या जोडीने ABVP विविध सामाजिक क्षेत्रांमध्येही आपला प्रभावी ठसा उमटवत आली आहे. पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य, सामाजिक समरसता, महिला सशक्तीकरण आणि आदिवासी भागातील कार्य ही तिची काही महत्त्वाची कार्यक्षेत्रे आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी ABVP विविध उपक्रम राबवते. यामध्ये नदी पुनरुज्जीवन, तलाव संवर्धन, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वच्छता अभियान’, ‘प्लास्टिकमुक्त परिसर’, आणि ‘हरित परिसर निर्मिती’ सारखे उपक्रम राबवले जातात. यामुळे युवकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण होते.
ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही ABVP सक्रिय आहे. ‘Students for Development’ (SFD) या उपक्रमाद्वारे ग्रामविकास मोहिमा, शिक्षणविकास शिबिरे आणि स्वच्छता मोहिमा राबवून ग्रामीण विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
आरोग्य विषयक जनजागृतीसाठी ‘Students for Seva’ या उपक्रमाअंतर्गत ABVP आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्रतपासणी आणि पोषण आहार जनजागृती कार्यक्रम आयोजित करते. विशेषतः कोविड-19 च्या काळात संघटनेने अनेक शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य तपासणी, मास्क आणि सॅनिटायझर वितरण, तसेच लसीकरण जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवल्या. या उपक्रमांमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
सामाजिक समरसतेसाठी ABVP “समरस भारत”, “एक गाव एक मंदिर एक विहीर” यांसारख्या कार्यक्रमांद्वारे जातीय तेढ कमी करण्याचा प्रयत्न करते. जातपात न मानता एकत्र समाजरचना घडवण्यावर भर दिला जातो.
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने ABVP ‘Mission Sahasi’ सारख्या उपक्रमांद्वारे महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, लैंगिक अत्याचारविरोधी जनजागृती आणि महिला हक्कांसाठी आंदोलन राबवते. शाळा, कॉलेज, गावांमध्ये मुलींना आत्मविश्वास आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जातो.
याशिवाय, आदिवासी व वनवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठीही ABVP कार्यरत आहे. या भागांमध्ये वाचनालये, शिक्षण शिबिरे, आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने केले जाते.
5.संघटनेतून घडलेले नेतृत्व
ABVP ने अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे जे आज त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत आणि देशाच्या विकासात योगदान देत आहेत. भारतातील काही प्रसिद्ध राजकीय नेते देखील एकेकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी होते.
1.अमित शाह
अमित शाह यांनी 1983 मध्ये अभाविपमधून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ. पुढे 1986 मध्ये भाजपमध्ये प्रवेश, आणि युवा मोर्चात सक्रिय सहभाग घेतला सध्या ते भारताचे गृहमंत्री आहेत. डिसेंबर 2023 मध्ये बुरारी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) 69 व्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना अमित शहा यांनी ABVP चे कौतुक केले होते शहा म्हणाले होते की “मी स्वतः विद्यार्थी परिषदेतून घडलो आहे. ही संघटना आजपर्यंत आपला उद्देश विसरली नाही, आणि तिने सरकारलाही चुकीच्या मार्गावर जाऊ दिलं नाही.”
2.राजनाथ सिंह
राजनाथ सिंह यांनी केवळ 13व्या वर्षीच 1964 मध्ये राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि नंतर ABVP शी जोडले गेले. 1969 ते 1971 या काळात ते गोरखपूर युनिटचे संघटन सचिव होते. आज ते भारताचे संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ABVP मधील सुरुवातीचे दिवस त्यांना शिस्त, संघटनकौशल्य आणि राष्ट्रहिताचे भान देणारे ठरले.
3.अरुण जेटली
1970 च्या दशकात दिल्ली विद्यापीठात अरुण जेटली हे ABVP चे विद्यार्थी नेते होते. 1974 मध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले, आणि नंतर ते ABVP चे अखिल भारतीय सचिव झाले. पुढे त्यांनी राजकीय जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्य केले.
4.नितीन गडकरी
नितीन गडकरी यांनी 1976 मध्ये ABVP मध्ये प्रवेश केला. त्यांनी ABVP चे 28वे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे आयोजित केले. वयाच्या २४व्या वर्षी ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. सध्या ते भारताचे महामार्ग आणि वाहतूक मंत्री आहेत. २८ जानेवारी २०२५ रोजी विदर्भ प्रांताच्या ५३व्या ABVP अधिवेशनात बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्या ABVP विषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या गडकरी म्हणाले होते की मी देखील विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. विद्यार्थी परिषदेने मला खूप काही शिकवले. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था या सर्वांचा एक शैक्षणिक परिवार असावा, अशी परिषदेची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांचे कर्तृत्व कसे घडवता येईल, यादृष्टीने संस्कार करणारी एक संघटना म्हणून परिषदेचा लौकीक आहे. विद्यार्थी परिषद ही संस्कार करणारी संघटना आहे.”आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे.”घाईने राजकारणात जायला नको, याची शिकवणही मिळाली. अशा भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या.
5.जेपी नड्डा
जेपी नड्डा यांचा राजकीय प्रवास 1975 मध्ये संपूर्ण क्रांतीच्या चळवळीपासून सुरू झाला. त्यानंतर ते ABVP मध्ये सक्रिय झाले. 1977 मध्ये त्यांनी पटना विद्यापीठात निवडणूक जिंकून नेतृत्व सिद्ध केले. आज ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्वकौशल्य आणि संघटनक्षमता ABVP मधून विकसित झाली.
इतर दिग्गज नेते
ABVP ही नेतृत्वाची शाळा असल्याचे अनेक उदाहरणांमधून सिद्ध होते. धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, राधा मोहन सिंग, प्रकाश जावडेकर यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनीही ABVP मधूनच आपली सुरुवात केली होती. प्रत्येकाच्या यशोगाथेच्या मागे ABVP ची कार्यशैली, प्रशिक्षण आणि राष्ट्रकार्याची भावना स्पष्टपणे दिसून येते.
महिलांचे योगदान
मैथिली मृणालिनी (Maithily Mrinalini)
पाटणा विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी मैथिली मृणालिनी. यांनी ABVP च्या पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदावर निवडून येऊन महिला नेतृत्वाचे उदाहरण प्रस्तुत केले. त्यांनी विद्यापीठात स्वच्छता, महिलांच्या समस्या आणि प्रवेश प्रक्रियेतील सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वामुळे ABVP ला पाटणा विद्यापीठात महत्त्वपूर्ण स्थान मिळाले
प्रेरणा पवार (Prerna Pawar)
पुणे येथील ABVP प्रदेश मंत्री म्हणून 2021 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्या महिला सुरक्षा आणि लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुढे आल्या होत्या. पुणे आणि मुंबईतील बलात्काराच्या घटनांवर त्यांनी परखडपणे राज्य सरकारला”महिलांच्या सुरक्षेत अपयश” आले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
6.सध्याची स्थिती आणि भविष्यातील दिशा
सध्याची स्थिती
2024-25 या शैक्षणिक वर्षात ABVP ने 55,12,470 विद्यार्थ्यांची सदस्यता नोंदवली आहे. ही आकडेवारी केवळ संघटनेची व्याप्ती दर्शवते असे नाही, तर देशातील युवकांमध्ये या संघटनेबद्दल असलेली विश्वसनीयता आणि प्रेरणा याचेही प्रतीक आहे. महाविद्यालय, विद्यापीठ, ग्रामीण आणि शहरी भागात कार्यरत हजारो युनिट्स आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ABVP ही संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी, शैक्षणिक सुधारणांसाठी आणि राष्ट्रीय पुनर्रचनेसाठी सातत्याने कार्य करत आहे. ABVP ने केवळ आंदोलनात्मक स्वरूप न ठेवता, संरचनात्मक आणि विकासात्मक उपक्रमांवर भर दिला आहे. त्यामुळे आज अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून संवाद साधणारी ही एक परिणामकारक संघटना बनली आहे.
भविष्यातील दिशा
आनंदमयी सार्थक विद्यार्थी जीवन अभियान” व “विद्यार्थी जीवन केंद्र” यांसारख्या मोहीमांना अधिक मजबूत स्वरूप दिले जाणार आहे. २०२५ पासून आरोग्य, पर्यावरण, महिला सशक्तीकरण, रोजगार‑सम्बंधी मुद्द्यांवर जागरूकता कार्यक्रम, सेमिनार, शिबिरे आयोजित केल्या जाणार आहेत. शिक्षणसंस्था‑शासन यांच्यात सुरु असलेल्या चर्चा‑परिषदेत ABVP सक्रियपणे भाग घेत असून, शैक्षणिक दर्जा शाश्वत ठेवण्यासाठी संघटना शासनाकडे आणि शैक्षणिक संस्थाकडे सतत पाठपुरावा करत आहे.