राज्यात आज पासून पावसाचा जोर वाढणार आहे.विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईत देखील सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
बुलढाणा जिल्ह्यात तब्बल महिनाभरानंतर झालेल्या पावसाच्या आगमनाने करपून चाललेल्या पिकांना काही प्रमाणात का होईना जीवदान मिळाले. त्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणा-या बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. घाटावरील देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, चिखली परिसरात सोयाबीन तर मोताळा, मलकापूर, नांदुरा पट्ट्यात कापसाला या पावसामुळे थोडा आधार मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात महिन्याभरानंतर पाऊस परतणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात साधारणपणे 35 ते 40 मिमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आज पासून पुढील काही दिवस नागपूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी मारठवड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगली, बीड या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.