विश्व साक्षरता दिवस असं म्हणताच मनात विचार येतो की साक्षरतेचा अर्थ फक्त अक्षर ओळख होणं किंवा खूप शिक्षण घेणं असा आहे का? शैक्षणिक दृष्ट्या साक्षर होणं हा साक्षरतेचा एक भाग आहे. ही साक्षरता तर महत्त्वाची आहेच, पण इतर बाबतीत साक्षर होणंही तितकंच महत्त्वाचं आहे .
शैक्षणिक साक्षरता,
राष्ट्रभक्ती ,राष्ट्रप्रेम साक्षरता,
आर्थिक साक्षरता,
पर्यावरण साक्षरता,
जल साक्षरता,
मतदान साक्षरता,
आणि स्व साक्षरता
साक्षरतेचे असे बरेच पैलू आहेत . आज आपण हे काही पैलू थोडक्यात पाहू या !
* शैक्षणिक साक्षरता –
आपला देश प्रगतिपथावर आहे. आपल्या देशाची लोकसंख्याही भरपूर आहे. आपल्या देशात शैक्षणिक साक्षरता वाढायला हवी आहे. तसेच आपली लोकसंख्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे, मात्र या बाबतीत बरेच जण साक्षर झालेले नाहीत, म्हणून लोकसंख्या जास्त आहे. जर देशातील तळा-गाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले तर आपोआप लोकसंख्या नियंत्रणात येईल, देशाची प्रगती होईल. माणसाला वैचारिक पातळी मिळाल्यामुळे त्याचे जीवन बदलून जाईल.
शिक्षण जर हाताला काम देणारे असेल तर त्यातून दोन पैसे मिळतील आणि प्रत्येक व्यक्ती आर्थिक सुदृढ होऊन देशाला आर्थिक बळकट करेल.म्हणजेच स्वतः बरोबर देशाचीही प्रगती होईल.
* राष्ट्रभक्ती – राष्ट्रप्रेमाची साक्षरता –
नाव वाचून असे वाटेल की आमचं आमच्या राष्ट्रावर प्रेम नाही का? आम्ही राष्ट्रभक्त नाही का? पण खरंच प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारून पहा बरं, आपण देशावर, राष्ट्रावर किती प्रेम करतो ते?
राष्ट्रप्रेम म्हणजे फक्त सैन्यात जाऊन लढणं, असं होत नाही ना? प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. जे सैनिक देशसेवा करतात त्यांना मानाचा मुजरा आहेच, पण आपण करत असलेलं प्रत्येक काम हे देशहितासाठी असलं तर ती राष्ट्रभक्तीच ठरेल!
‘राष्ट्र प्रथम आणि मी शेवटी’ असा विचार करून जर कृती केली तर नक्कीच स्वतःची नी देशाची प्रगती होईल.
पण हे शिकवलं न गेल्यामुळे त्या साक्षरतेचे बीज मनात रुजतच नाही.
सार्वजनीक ठिकाणी जाताना, कुठेही कचरा टाकणे, कुठेही थुंकणे, गाड्या कशाही नी कुठेही पार्क करणे, सिग्नल तोडणे, खूप हाॕर्न वाजवणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्या देशात घडत असतात, याचं कारण एकच ते म्हणजे या बाबतीतील निरक्षरता होय .
जसं घर माझं आहे ही भावना लहानपणापासूनच मनावर बिंबवली जाते तसंच देश, रस्ते, रेल्वे, बस सारं माझं आहे, हे शिकवलं गेलं, तर या गोष्टी होणारच नाहीत. आपण आपल्या वस्तु तोडतो का? आपलं घर घाण करतो का? नाही ना! म्हणून प्रत्येकाने राष्ट्रप्रेम साक्षर व्हायला हवं…!
*पर्यावरण साक्षरता –
पर्यावरणाची साक्षरताही नसल्यामुळे पर्यावरणास पूरक वागलं जात नाही. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते नी मग पुढे खूप प्रश्न उभे राहतात. देशाची नी स्वतःची प्रगती ही नेहमी पर्यावरण पूरकच हवी. आपण पर्यावरण साक्षर होणं म्हणूनच महत्त्वाचं आहे.
* जलसाक्षरता –
पाणी कसं नी किती वापरावं हे माहीत नसल्याने किंवा त्याचं महत्त्व न समजल्याने पाण्याचा वापर वाट्टेल तसा होतो नी मग दुष्काळाला तोंड द्यावं लागतं.
देशी झाडं लावणं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं या सर्व गोष्टींचा अभाव असल्याने असं होतं. म्हणून प्रत्येकाने जलसाक्षर व्हायला हवं.
* मतदान साक्षरता –
मतदानाच्या साक्षरतेचा अभाव आपल्याकडे आढळतो. लोकांचे हित पाहणारी व्यक्ती जर राज्यकर्ता म्हणून हवी असेल त्या व्यक्तीला मतदान करायला पाहिजे. उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या व्यक्तींची माहिती घेतली पाहिजे. योग्य उमेदवार निवडला पाहिजे.
मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून ट्रिपला न जाता आपला हक्क बजावावा लागेल. मतदार यादीत नाव नसेल तर तेही नोंदवावे लागेल, तरच हे शक्य होईल. इथेही साक्षर व्हावं लागेल.
*आर्थिक साक्षरता –
शिक्षणाने माणसाला पैसा तर मिळेल, पण तो काटकसर करून बचत केली पाहिजे. बचतीचा पैसा कुठे नी कसा गुंतवायचा हे कळलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कमावलेल्या पैशाचा टॕक्स ही भरावा लागेल, तरच देशहित साधेल. ही साक्षरता फार महत्त्वाची आहे .
*स्व साक्षरता –
आता शेवटचं नी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करायला आपलं मन आणि शरीर दोन्ही निरोगी आणि आनंदी असायला हवं, तरच हे सारं शक्य होईल.
त्यासाठी ‘स्व’ ची साक्षरता असणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी नियमित यम ,नियम,योगसाधना ,ध्यानधारणा, प्रायाणाम यांचं शिक्षण घेऊन – साक्षर होऊन – स्वतः सुदृढ होणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्र सुदृढ करता येईल चला तर मग, आपण सारे निश्चय करू या की, मी राष्ट्रासाठी स्वतः सर्व प्रकारे साक्षर होईन नि दुस-याला साक्षर होण्यास मदत करेन .
आज पासून सर्व साक्षरतेचा दिवा आपण सारे घरोघर लावू या!
सौ. सुहासिनी सुरेश शिराढोणकर.पुणे
तुळजा शाखा
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र