दिल्लीमध्ये आज आणि उद्या असे दोन दिवस G 20 शिखर परिषद बैठक पार पडणार आहे.या दोन दिवसीय परिषदेसाठी १९ राष्ट्रांचे प्रमुख व युरोपियन युनियनचे सदस्य दिल्लीत दाखल झाले आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या शिखर परिषदेची सुरवात होताना आपल्या पहिल्याच भाषणात अडीच हजार वर्षांपूर्वीचा संदर्भ दिला. तसेच भारताच्या भूमीने अडीच हजार वर्षांपूर्वीच मानवतेचे कल्याण व सुख निश्चित करण्याचा संदेश दिल्याचे आवर्जून नमूद केले.
या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी एका प्राकृत भाषेतील मंत्रामधून सर्व उपस्थितांना एक संदेश दिला. “प्रगती मैदानापासून काही किलोमीटर अंतरावर एक 2,500 वर्षे जुना स्तंभ आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिले आहे, की – ‘हेवं लोकशःहित मुखेति, अथः इयं नातेशु हेवं’. अर्थात, मानवतेचं हित आणि कल्याण सुनिश्चित होऊदे.”
तसेच जी २० चा अध्यक्ष म्हणून भारत सर्व देशांचे स्वागत करतो. २१ व्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ आहे. हा असा काळ आहे जेव्हा अनेक वर्षांच्या अडचणी आता नव्या उपाययोजनांची मागणी करत आहेत. म्हणून आपल्याला मानवकेंद्री दृष्टीने पाऊल उचलत जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आणि पुढे जावे लागेल.”G 20 मुळं मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.भारताकडे असलेले अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
G20 शिखर परिषदेत संबोधनाला सुरुवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को येथील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झाले. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे.”
तसेच या वेळी आफ्रिकन यूनियनला स्थायी सदस्यत्व देण्यात आले असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी G20 च्या मंचावर केली. आफ्रिकन युनियन आता या आंतरराष्ट्रीय समूहाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार आहे. युरोपीय युनियन पाठोपाठ आता आफ्रिकन युनियन पण G-20 समूहाचा भाग बनणार आहे. त्यामुळे यापुढे G-20 ला G-21 म्हटले जाईल असे त्यांनी सांगितले.
आज भारत मंडपम मध्ये जगभरातील नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली दरम्यान, G20 परिषदेतही इंडिया नावाचा वापर दिसला नाही. मोदींसमोर भारत असे नाव लिहिलेले होते त्याशिवाय मोदींकडून भारत असाच उल्लेख करण्यात आला.