मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सहृयाद्री येथे आज सायंकाळी बैठक होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आज नागपूरात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण आणि ओसीबी आरक्षण या मुद्यांवर बोलले.
ओबीसी समाजात भिती आहे की आमचे आरक्षण कमी होणार, पण सरकारचा असा कुठलाही हेतू नाही. ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये. आमच्या सरकारच्या वतीने आम्ही ओबीसी समाजाला आश्वस्त करतोय की काहीही झाले तरी सरकार ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात आश्वस्त केले.