सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश
पुण्यातील एस.पी. कॉलेज येथे १४ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेच संघटन मंत्री बीएल संतोष हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
सुनील आंबेकर म्हणाले की, देशातील अनेक भागांत दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येत असते. त्याच पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील एस.पी. कॉलेज येथे १४ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.या बैठकीला देशभरातील ३६ संघटनांचे सुमारे २६६ प्रमुख अधिकारी असतील.पर्यावरण पूरक जीवनशैली, जीवनमूल्यावर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्ये पार पाडणे, या पाच मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. रा. स्व. संघ समन्वय बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आज सुनील जी यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण दबडघावजीही उपस्थित होते.
श्री. आंबेकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करत असतात. दैनंदिन शाखेच्या कामाबरोबरच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात संघाचे कार्यकर्ते विविध सामाजिक कामांमध्ये मग्न असतात. ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत.
बैठकीत सहभागी होणार्या सर्व संघटना संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य व त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. यातल्या अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात. उदा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. अशाप्रकारच्या सामूहिक कामावरही बैठकीमध्ये चर्चा होते, अशी माहिती श्री. आंबेकर यांनी दिली.
समाजासमोर जी आव्हाने येतात त्यांचा विचार करून कार्याची दिशा निश्चित करणे,आणि राष्ट्रीय भावनेने काम करणे हा या बैठकीचा उद्देश आहे ज्यातून कामाचा वेग वाढेल. जवळपास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या साऱ्या संघटना अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रिय असून त्यांनी आपल्या परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीत मांडतील. तसेच राष्ट्रीय आणि वर्तमान परिस्थितीच्या संदर्भातील अनुभव देखील सांगितले जातील. त्यासंबंधित अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असेही श्री. आंबेकर म्हणाले.
पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह श्री. दत्तात्रेयजी होसबाळे, तसेच डॉ. कृष्णगोपालजी, डॉ. मनमोहनजी वैद्य, श्री. अरुण कुमारजी, श्री. मुकुंदाजी आणि श्री. रामदत्तजी चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,सक्षम,वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
श्री. आंबेकर म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण,त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे.
दरवर्षी ही समन्वय बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षीची बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे झाली होती.