भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता . हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते. त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला, तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले.भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला.मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी. हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान विशेष उल्लेखनिय ठरले. . बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर अश्या अनेकांच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल करणे शक्य नाही.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या वेळी विविध सामाजिक संघटनांनी महत्वाची भूमिका बजावली. ‘मराठवाडा प्रतिष्ठान’ ह्यामहत्वपूर्ण संघटनेने त्या काळातील संघर्षात सक्रिय भूमिका बजावली तसेच अनेक युवा संघटनांनीही निजाम शासनाविरुद्ध मोर्चे उभारले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग उल्लेखनीय होता. सरसंघचालक प.पु हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनी अनेक कार्यकर्त्यांना या लढ्यामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वतंत्रता सेनानी स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर हे डॉक्टर हेडगेवार यांच्या सल्ल्यानुसारच भागानगर सत्याग्रहामध्ये सामील झाले, त्यानंतर निजामाकडून झालेल्या १ वर्षाच्या शिक्षेदरम्यान ते जेल मध्येही शाखा भरवत असत.
७ सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला.
भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ले सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी १७ सप्टेंबर, १९४८ रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत १३ महिने लढले गेले. निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन हैद्राबाद संस्थानावर भारतीय तिरंगा फडकला. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला.
हैदराबाद मुक्ती लढ्यात रझाकार व इत्तेहादुल मुसलमिन (MIM) नंतर अखंड भारताला विरोध कोणी केला असेल तर ते कम्युनिस्ट होते. कम्युनिस्टांनी अनेक वेळा निजाम आणि रझाकार यांना पूरक भूमिका घेतल्या.
मराठवाडा मुक्ती लढा केवळ दहा – पंधरा वर्षांचा लढा नव्हता; अगोदर मराठ्यांनी आणि नंतर सर्व हिंदू समाजाने स्थानिक पातळीवर सुरू केलेला अनेक दशकांचा हा लढा होता. 1948 मध्ये हा लढा पूर्णतः यशस्वी झाला.हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला.