मागच्या भागात आपण पाहिले की स्वतः एल्फिन्स्टनने त्याच्या जर्नलमध्ये लिहून ठेवलेले आहे की त्याला पेशव्याच्या ‘विजयी’ सैन्याशी सामना होईल अशी अटकळ होती किंवा स्मिथ येत आहे ह्या बातमीमुळे निघून गेलेल्या पेशव्यामुळे स्टॉन्टनचे सैनिक जिवंत वाचलेत. किंवा पुढे स्टॉन्टनला भेटल्यानंतरच्या त्याच्या जर्नलमधल्या वर्णनात कोरेगावमध्ये स्टॉन्टनच्या सैन्याच्या झालेल्या दारुण अवस्थेचीही कल्पना येते.
स्टॉन्टन हा सैन्यात फक्त एक साधा कॅप्टन होता. कोणी मोठा अधिकारी – म्हणजे कर्नल अथवा ब्रिगेडिअर – वगैरे नव्हता. तरीही त्याने त्याचे थोडेसे सैन्य वापरून अतिशय विपरीत परिस्थितीत आणि अन्नपाण्याशिवाय मराठ्यांच्या मोठ्या सैन्याशी लढायची तडफ दाखवलेली होती. कोरेगावात वेढ्यात अडकलेला असतानाही प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्याने शरणागती पत्करली नाही किंवा कोणतीही लूट होऊ दिली नाही. इंग्रजांच्या दृष्टीने ही फार महत्वाची घटना होती. ह्याबद्दल स्टॉन्टनचेही चहूबाजूंनी कौतुक झाले. स्टॉन्टनला एक खास तलवार आणि ५०० सोन्याच्या गिनी (नाणी) बक्षीस देण्यात आली. त्याला मेजर म्हणून बढतीही दिली गेली.
२६ जून १८१८ रोजी एल्फिन्स्टनने कलकत्त्याला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलला एक खास पत्र पाठवून कोरेगावच्या युद्धात कामी आलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगावातच स्मारक बांधायची परवानगी मागितली होती. १९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून त्याला परवानगीचे पत्र पाठवण्यात आले. एल्फिन्स्टनला ह्या स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी सांगण्यात आले. त्याला अशीही सूचना आली की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत.
१३ नोव्हेंबर १८१९ रोजी मुंबईच्या गव्हर्नरतर्फे कोरेगावात लढलेल्या सगळ्या सैनिकांना खास बक्षीस म्हणून ५ वर्षांची सिनियॉरिटी देण्यात आली – जेणेकरून सगळ्यांचे पेन्शन रिटायरमेंटच्या ५ वर्षे आधी सुरु होईल (आणि ते तोपर्यंत इंग्रजी सैन्यामधूनच लढतील. हे पहा आजकालच्या कॉर्पोरेट संस्कृतीमधल्या व्हेस्टेड बोनसचे २०० वर्षांपूर्वीचे उदाहरण!) . पुढे १५ जानेवारी १८२० रोजी बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या समितीकडून कोरेगावातल्या स्तंभाच्या बांधकामाच्या ३ निविदांपैकी १ निविदा पास झाली. एकूण खर्च ३४१५१ रुपये अपेक्षित होता आणि तेवढ्याच खर्चात हे स्मारक बनले. ह्या निविदेमध्येही स्पष्ट उल्लेख आहे की हा स्तंभ त्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ आहे जे १ जानेवारी १८१८ च्या युद्धात मारले गेले. (“…to commemorate the heroic example of officers and men who fell at that village on the 1st January 1818…”) येथेही कुठेही कोणत्याही ‘विजया’चा उल्लेख नाही.
पुढील दोन वर्षात हा स्तंभ बांधून पूर्ण झाला. १३ डिसेंबर १८२४ रोजी मुंबई सरकारकडून कोरेगावच्या स्तंभाची देखभाल करण्यासाठी ट्रस्ट बनवले गेले. कोरेगावच्या लढाईत हवालदार म्हणून लढताना अपंगत्व आलेल्या खंडूजी मुळोजी नावाच्या व्यक्तीची तेथे देखरेखीसाठी नेमणूक झाली. त्याला जमादाराची पदोन्नती देण्यात आली. स्तंभाजवळ एक जमीनीचा छोटासा तुकडाही त्याला घर बांधण्यासाठी सरकारकडून देण्यात आला. हे काम त्याला वंशपरंपरागत सांगितले गेले. त्याच्या घराण्यात पुढे वारस नसल्यास सरकारचा निर्णय अंतिम राहील असेही कलम टाकण्यात आले.
ह्या सगळ्या कागदपत्रांवरून सरळ दिसतंय की हा स्तंभ कोणताही विजय साजरा करण्यासाठी नसून फक्त ह्या लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला होता जे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेले होते. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं पण धूर्त एल्फिन्स्टनने ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गडबड करून – दुहीची बीजं पेरून ठेवली होती – ज्याची फळं आपण आजही पाहतोय. त्याने असं नक्की काय केलं – पाहूयात पुढच्या भागात!
संदर्भ
ब्रिटिश लायब्ररी (IOR/F/4/719/19545 : Jun 1818-Jan 1820)
‘Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818’ – by John Wylie [1839]
British Library Shelf-mark: 10057.pp.10
सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना:
आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक#भीमा_कोरेगाव
Sanket Kulkarni
#भीमा_कोरेगाव, भाग_५, इतिहासाच्या_पाऊलखुणा
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे