कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव सोहळा नुकताच पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजलेल्या रथावर श्री करवीर निवासिनी अंबाबाई विराजमान झाली होती . नयनरम्य आतिषबाजी, फुलांची उधळण करत सोहळा पार पडला….
कोल्हापूर म्हटलं की देवी अंबाबाईचे नाव आपसूकच तोंडात येते. कोल्हापुरची महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पीठ म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा उल्लेख आहे. महालक्ष्मीचे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत. जुन्या मंदिरातील खांबाला ‘गरूड खांब’ म्हणतात.
ठराविक दिवशी उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापुरात येतात.
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचा रथोत्सव हा मंदिराच्या वर्षभरातील अनेक उत्सव सोहळ्यांपैकी प्रमुख उत्सव असतो. ज्योतिबाची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’ च्या जयघोषात रथोत्सवाची सुरवात होते. या रथोत्सवात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते.
अंबाबाईचा रथोत्सव म्हणजे अंबा भक्तांना एक विशेष पर्वणीच असते. आकर्षक रांगोळ्या, मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृटी, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, बँड पथके, लेझीम पथके, नेत्रदीपक आतषबाजी करण्यात येते. ‘अंबा माता की जय’ चा अखंड गजर, हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सवमूर्ती, अशा मंगलमय वातावरणात रथामधून नगरप्रदक्षिणा करून रथोत्सव पार पडतो.
तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात येते. भाविकांना असे वाटते की देवी भक्तांच्या भेटीसाठी गाभाऱ्यातील बाहेर येते. अशी ही करवीर निवासिनी अंबामाता सर्वांना स्थैर्य, सुख आणि समृद्धी देवो….
*सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके l शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ll*
अवनी कुलकर्णी, विटा
सौजन्य – समिती संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत