नुकतीच देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली असून निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. आता या निवडणुकीसाठीच्या अंतिम मतमोजणीला उद्या म्हणजे ४ जून रोजी सकाळी सुरवात होणार आहे. दरम्यान, उद्या सकाळी ८ वाजता सर्वप्रथम पोस्टल बॅलेटच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे आकडे समोर येतील तसेच त्यानंतर प्रत्येक फेरीला २२ मिनिटे लागणार असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उद्या ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल.यानंतर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान तीन प्रकारच्या पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे. सैनिकांना इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम (ईटीपीबीएस) नुसार ऑनलाइन मतपत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत या मतपत्रिका स्वीकारण्यात येतील.
याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदारसंघात नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या केंद्रांवर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान केले होते. यासाठी पोस्टल बॅलेटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या मतांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्या पोस्टल मतांची तपासणी आधी करण्यात येणार आहे.
एका टेबलवर ५०० मतपत्रिकांप्रमाणे गरजेनुसार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. पात्र-अपात्र मतपत्रिकांची निवड करणे, त्यानंतर पात्र मतपत्रिका उघडून संबंधित उमेदवारांच्या रकान्यात जमा करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल,असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे .
उद्या सकाळी 8.30 वाजेपासून प्राथमिक कल समजण्यास सुरुवात होईल. निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास सर्वच 543 जागांचे कल समोर येणार आहेत. तर कोण आघाडीवर आहेआणि कोण पिछाडीवर हे यावेळी समोर येईल. तसेच बहुतांश जागांचे निकाल सायंकाळी 4 वाजेपर्यंत घोषित होण्याची अपेक्षा आहे.