लोकसभा निवडणुकीचे निकाल आज देशासमोर आले आहेत. एकक्सित पोलनुसार एनडीएला एकहाती सत्ता मिळेल आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे चित्र पाहायला मिळाले. मात्र आज प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाहीये. कारण ५४३ पैकी एनडीएला २९१ तर त्यात भाजपला २३९ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीने देखील दमदार कामगिरी करत २३६ जागांवर आघाडी मिळविली आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ”लोकसभेचा निकाल हा आम्हाला विधानसभेत चित्र बदलण्यासाठी बळ देणारा आहे. आजच्या निकालात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची दिसत आहे. देशातील चित्र आमच्यासाठी आशादायक दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील निकाल चांगला लागला आहे.. तसेच भाजपाच्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने धडा शिकविला.”
आजच्या निकालानंतर इंडिया अगदी आणि एनडीए यांच्यात बैठकांचे सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. उद्या राजधानी दिल्ली दोन्ही आघाड्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.