काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र पाठवले आहे. मंगळवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर इंडिया आघाडीच्या पक्षांच्या खासदारांसोबत बैठक झाली. अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी ९ मुद्दे मांडले आहेत. यामध्ये आर्थिक स्थिती, बेरोजगारी, महागाई अश्या विषयांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संघीय संरचना,राज्य सरकारवरील हल्ले, देशातील सांप्रदायिक तणाव,मणिपूर हिंसाचार , लडाखमधील चीनची घुसखोरी हे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
तसेच या पत्रात त्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा मागितला आहे. इतर पक्षांशी कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आले, असा सवालही सोनिया गांधी यांनी केला आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या आठवड्यात संसदेच्या १८ ते २२सप्टेंबर या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाची माहिती दिली होती.