मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण चालू आहे. आज त्यांची अट मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहेत.त्यानंतर ते तिथे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करतील.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इथे येऊन उपोषण सोडवावे अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. ही अट देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. एकनाथ शिंदे हे अजित पवारांसह दुपारी साडेतीन वाजता मुंबईहून जालन्यासाठी रवाना होतील.
यावेळी सरकारचे अनेक मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांसोबत असतील असे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळातील या तीन बड्या मंत्र्यांच्या भेटीनंतर तरी जरांगे उपोषण मागे घेतात का आणि मराठा समाज समाधानी होतो का हे पाहावे लागणार आहे.