७ मे २०२५ रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक आणि नियंत्रित कारवाई केली. ही कारवाई पूर्णपणे दहशतवादी गटांना लक्ष्य करणारी होती आणि नागरी ठिकाणांपासून दूर ठेवण्यात आली होती. भारताने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई म्हणजे स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेलं पाउल होतं. पण यानंतर पाकिस्तानातून आलेल्या प्रतिक्रिया पाहता, चित्र वेगळंच रंगवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
पाकिस्तानी सोशल मीडिया
भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या सरकारपेक्षा वेगाने, तिथले कलाकार, क्रिकेटपटू, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पुढे आले. सोशल मीडियावर त्यांनी भारताच्या कारवाईविरोधात प्रचंड टीका केली. यामध्ये दहशतवादी गटांचा एकही उल्लेख न करता भारतालाच ‘हल्लेखोर’, ‘भ्याड’, ‘क्रूर’ असं चित्रित केलं गेलं. काही पोस्ट्समध्ये तर भारतीय माध्यमांवर ‘द्वेष पसरवणं’ आणि ‘मानवतेविरोधी कारवाया’ केल्याचा आरोप करण्यात आला.
पण यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रतिक्रियांमध्ये कोणत्याही प्रकारचा तर्क, तथ्य किंवा पुरावा नव्हता. ना कारवाईत नागरिक मारले गेले याचे पुरावे, ना दहशतवादी छावण्यांविषयी काही कबुली. एकाच सुरात, एकाच भाषेत आणि एकाच भावनिक आवेशात भारताविरोधात अपप्रचार सुरु झाला.
ज्यांनी भारतात नाव कमावलं, तेच आता विरोधात?
भारतीय सिनेसृष्टी, जाहिरातविश्व आणि क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांनी स्वीकारलेले फवाद खान, माहिरा खान, अली झफर, बाबर आझम यांसारखे अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी या लाटेत सामील झाले. यापैकी अनेकांनी याआधी भारतात काम करून प्रसिद्धी, पैसा, ओळख आणि प्रेम मिळवलं होतं. पण आज हेच लोक भारताच्या निर्णयांवर टीका करताना, त्याच देशावर अपशब्द उधळताना दिसत आहेत.
माहिरा खानची पोस्ट
माहिरा खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये तिने भारताच्या कारवाईला ‘भ्याडपणा’ म्हटलं. ती म्हणाली की, भारत द्वेष पसरवतो आणि मानवतेचा अपमान करतो. पण या वक्तव्यात तिने एकदाही ‘दहशतवाद’ या शब्दाचा उच्चार केला नाही. तिने एकाही दहशतवादी संघटनेचा निषेध केला नाही. यावरून प्रश्न पडतो की खरोखरच तिची सहानुभूती मानवतेसाठीच आहे का?
फवाद खान, अली झफर
फवाद खानने दहशतवाद्यांच्या मृत्यूबद्दल सहानुभूती व्यक्त करत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिला. अली झफरनेही मानवतेच्या नावाखाली भारतावर आरोप केले. पण हे लोक ज्या भूमीवरून प्रसिद्ध झाले, त्या भारतातल्या शेकडो नागरिकांची हत्या करणाऱ्या गटांविरुद्ध एकही शब्द का नाही बोलले?
खोटं नैरेटिव्ह, पण जागतिक प्रभाव
या पोस्ट्स केवळ पाकिस्तानातील जनतेला उद्देशून नाहीत, तर आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही एक विशिष्ट दृष्टीकोन पुरवतात. “भारत आक्रमक आहे, पाकिस्तान बळी आहे.” ही गोष्ट धोकादायक आहे कारण ही वैश्विक जनमत तयार करण्यात मदत करते. जेव्हा सेलिब्रिटी अशा भूमिका घेतात, तेव्हा त्यांच्या फॉलोअर्सना वाटतं की हे सत्य आहे, कारण “ते प्रसिद्ध आहेत, त्यांना माहिती असेल”. पण हेच प्रसिद्धीचं शस्त्र जर अपप्रचारासाठी वापरलं गेलं, तर ते समाजासाठी घातक ठरतं.
Babar Azam's Instagram story. 🇵🇰🔥 pic.twitter.com/66L0eEfviq
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) May 8, 2025
कलाकार की प्रचारक
सर्वात गंभीर प्रश्न इथे उपस्थित होतो की हे लोक कलाकार आहेत की कोणत्यातरी विचारधारेचे प्रचारक? केवळ अभिनय, संगीत किंवा खेळ यामधून प्रसिद्धी मिळवणं हे एक गोष्ट, पण त्या प्रसिद्धीचा वापर भारताविरोधी वैचारिक युद्धासाठी करणं ही दुसरी, अधिक गंभीर गोष्ट आहे. याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येईल का, की माहिती युद्धातील ‘सॉफ्ट टार्गेट्स’?
भारतीय प्रेक्षकांना आत्मपरीक्षणाची गरज
या पार्श्वभूमीवर, भारतीय प्रेक्षकांनीही विचार करायला हवा – आपण ज्यांना स्वीकारतो, ओवाळून घेतो, त्यांचं भारताबद्दलचं दृष्टीकोन काय आहे? आपण ज्यांचं कौतुक करतो, जे आमचं मनोरंजन करतात, तेच जर आपल्या देशाच्या संरक्षणाविरोधात बोलत असतील, तर आपण त्यांना अद्याप “आपलं” म्हणावं का?
प्रसिद्धी सोबत जबाबदारीही येते
लोकप्रियता ही केवळ टाळ्यांपुरती मर्यादित नसते. त्यासोबत एक सामाजिक जबाबदारी येते विशेषतः जेव्हा ती जागतिक स्तरावर पोहोचते. शांती, मानवता, सहानुभूती या शब्दांचा वापर केवळ भावनिक खेळासाठी केला जाऊ नये. कारण खरं मानवतेचं समर्थन हे दहशतवादाचा विरोध करूनच करता येतं, त्याच्याशी मैत्री करून नव्हे.
एकूणच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जे पाऊल उचललं, ते देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक होतं. त्या कारवाईवर मतभिन्नता असू शकते, पण अपप्रचार, खोटं चित्र उभं करणं आणि दहशतवाद्यांबद्दल मौन बाळगणं ही गोष्टी माफ करण्यासारख्या नाहीत. कलाकारांनी कोणत्याही देशातील असोत, ही गोष्ट लक्षात ठेवावी की लोकप्रियता केवळ चकाकी नाही, ती एक जबाबदारी आहे.
#PakistanZindabad pic.twitter.com/WE99g26oeu
— Arshad Nadeem (@ArshadOlympian1) May 7, 2025