तब्बल तीन वर्षापासून राज्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचा ताबा हा प्रशासकाकडे आहे. राज्यात नुकतच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आल्यानंतर सगळ्यांचाच नजरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलं आहे. कारणं नवीन सरकार आल्यावर लागलीच निवडणुका होतील ही अटकळ बांधली जात होती. त्याचीच आता चाहूल लागलेली दिसते. कारण या निवडणुकीपूर्वी राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यासाठी सज्ज झाल्याचं बोललं जातंय. याच ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात देखील झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत खरी चुरस निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण यासह प्रमुख शहरातील अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होत आहेत. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अनपेक्षित यश मिळालं. शिंदेंच्या नेतृत्वात पक्षाचे तब्बल ५७ आमदार निवडून आलेत आणि एकनाथ शिंदे हे मोठ्या थाटात उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत.
विधानसभा आणि लोकसभेत भाजपासोबत युतीत लढलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीत स्वबळाची तयारी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे. राज्यात २७ महापालिका, २४३ नगरपालिका, ३७ नगर पंचायत, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयासाठी ठाकरेंकडील नेते, कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहेत. जर शिंदेसेनेने मुंबई, ठाणेसारख्या महापालिकेत भाजपासोबत मिळून सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले तर उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला जबरदस्त झटका बसण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने ऑपरेशन टायगर सुरू झालंय.
मुंबई महानगरपालिकेचा विचार करता. त्या महापालिकेवर १९८५ सालापासून ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या झंझावातात पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात गेली होती. पण गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता. यंदा ठाकरेंना तगडं आव्हान असणार आहे. कारण यंदा मुंबई महापालिकेत शिंदे सेना मजबूत झाली तर भाजपासोबत मिळून ते ठाकरेंना सत्तेबाहेर काढू शकतात. त्यामुळे ऑपरेशन टायगर शिंदेंच्या शिवसेनेकडून राबवलं जात आहे. अशी चर्चा आहे.
२७ जानेवारीला मुंबई, नाशिक, कोल्हापूर, जळगाव येथील अनेक ठाकरेंकडील नेते, कार्यकर्ते शिंदेसेनेत सहभागी झाले. अनेक जुने – जाणते नेते उध्दव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेसेनेत दाखल झालेत. एकनाथ शिंदे सत्तेत असल्याने पक्ष मजबूत करणं त्यांना आणखी सोपे जात आहे.शिंदेंना केवळ शहरातूनच नाही तर ग्रामीण भागावतूनही पाठिंबा मिळतो आहे. शाहपूर, भिवंडी, कल्याण येथील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांनीही शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
आता हे पक्ष बदलणारे बहुतांश सत्तेचे भुकेले आहेत. त्यांनी विरोधात राहून लोकांच्या प्रश्नावर भांडण्यापेक्षा सत्तेत राहणे पसंत केले. काही कट्टर समर्थक सोडून गेल्याने काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. शिंदेसेनेच्या अभियानानंतर २४ जानेवारीला ठाकरेंनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ज्यांना कुणाला पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी खुशाल जावे. मला प्रामाणिक लोकांसोबत माझा पक्ष चालवायचा आहे असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र तरीही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव झाला तर ते शिंदेंनी सुरू केलेले ऑपरेशन टायगर हे कधी विसरू शकणार नाहीत. हेच सत्य असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि एकंदरीत त्यांची सगळी यंत्रणा प्रचंड हवेत गेली होती. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरेंचा खरा कसं लागणार आहे. तसेच जर यंदा मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यातून गेली तर ठाकरे म्हणजेच मुंबई हे समीकरण देखील बदलणार आहे.