हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक असून, भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर अनेक देशांमध्ये या धर्माचे अनुयायी राहतात. परंतु अलीकडच्या काळात, जगभरात विविध ठिकाणी हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. हे हल्ले केवळ शारीरिक नसून, सांस्कृतिक, धार्मिक आणि मानसिक पातळीवरदेखील होत आहेत.त्यामुळे हिंदूंवर होणारे हल्ले ही एक गंभीर जागतिक समस्या बनली आहे. पण हे हल्ले का घडत आहेत? म्हणजेच यामागची कारणे जाणून घेत असताना यामागची पाश्र्वभूमी आणि परिणाम समजून घेणेही अत्यावश्यक आहे.
सध्या ज्या हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. तो पहलगाम मधील हल्ला तर खुपच चिड आणणारा आहे. हा हल्ला २२ एप्रिल २०२५ रोजी घडला. ज्यामध्ये २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना चक्क त्यांचा धर्म विचारला तसेच त्यांना इस्लामीक कलमा वाचायला सांगितले पण ज्या २६ हिंदू पर्यटकांनी याला विरोध केला त्या सर्वांना दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. कर्नाटकातील एका मंजुनाथ नावाच्या कुटुंब प्रमुखालाही त्यांनी ठार मारले. डोळ्यादेखत आपल्या पतीला मरताना पाहून त्यांची पत्नी पल्लवी म्हणाल्या की मलाही मारुन टाका पण त्यांनी सांगितले की तुला मारणार नाही जा मोदींना जाऊन सांग.
खरतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदूत्वादी विचारांचे सरकार आल्यापासून अनेक देशविरोधी शक्तींच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. तसेच जेंव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू झाले आहे तेंव्हापासून या भागात दहशतवादी कारवाया खुप कमी झाल्या होत्या शिवाय इतके दिवस हा भुभाग शांत होता. पण आता पहलगाम येथील हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. या हल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट आटोपला होता. सौदी अरेबियाच्या सरकारने आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणासाठीही पंतप्रधान मोदी थांबले नव्हते. ही बातमी समजताच ते लगोलग मायदेशी परतले, त्यानंतर मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले. अजूनही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पण असे असले तरी जगभरात हिंदू समुदायावर होणारे वाढते हल्ले हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ
इतिहासात अनेक वेळा धार्मिक संघर्ष झाले आहेत. इस्लामी आक्रमण, ब्रिटिश वसाहतवाद, आणि नंतरच्या कालखंडात हिंदू धर्माला अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही देशांमध्ये हिंदूंना दुय्यम वागणूक देण्यात आली आणि त्यांची मंदिरे, शिक्षणसंस्था, व्यवसाय हे उद्ध्वस्त करण्यात आले. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये विभाजनानंतर अनेक हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले. बांगलादेशात अनेक वेळा हिंदू समुदायावर हल्ले झाले, तर अफगाणिस्तानात उरलेसुरले हिंदू-शिख अल्पसंख्यांक आजही जीवाच्या भीतीने जगत आहेत. आजही एखाद्या देशातून हिंदूंवर झालेल्या हल्ल्याची बातमी जेंव्हा कानावर येऊन आदळते तेंव्हा त्या आपल्या बांधुवांचे हाल पाहून अस्वस्थ व्हायला होतं. आता मागील दोन वर्षात कोणकोणत्या देशात हिंदूं समुदायावर हल्ले झाले ते जाणून घेऊयात.
1. बांगलादेश
बांगलादेशात २०२४-२५ दरम्यान हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांची संख्या आणि तीव्रता चिंताजनक आहे. भारत सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये बांगलादेशात हिंदूंवर २,२०० हल्ले झाले आहेत, ज्यात २३ हिंदूंचा मृत्यू झाला आणि १५२ मंदिरे उद्ध्वस्त झाली आहेत. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये, २०२४ च्या नोव्हेंबर ते जानेवारी २०२५ दरम्यान ७६ हल्ल्यांची नोंद झाली आहे. या काळात, हिंदू नेते कृष्ण दास प्रभू यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर चिटगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, या घटनांमुळे भारत-बांगलादेश संबंध तणावग्रस्त झाले आहेत. भारताने बांगलादेश सरकारकडे हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, भारताचे परराष्ट्र सचिव बांगलादेश दौऱ्यावर गेले होते, ज्यात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. खरतर ज्या बांगलादेशाला त्याच्या निर्मिती पासून आतापर्यंत भारत मदत करत आला तोच बांगलादेश बांगलादेशी हिंदूंशी क्रुरपणे वागत असल्याने जगभरातील हिंदू समुदायाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
2.कॅनडा
कॅनडा हा जगात सर्वसमावेशक आणि बहुसांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो. विविध धर्म, जाती आणि संस्कृतींचे येथे मुक्तपणे सहअस्तित्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेषतः हिंदू समुदायावर होणाऱ्या हिंसक आणि द्वेषमूलक हल्ल्यांमुळे या प्रतिमेला तडा गेला आहे. 2021 पासून कॅनडातील विविध हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेषतः ग्रेटर टोरांटो क्षेत्रात (GTA), ब्रॅम्प्टन, मिसिसॉगा आणि टोरांटो शहरांमध्ये हिंदू मंदिरांच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणे, मंदीराची तोडफोड करणे, आणि पुजा पाठ करणाऱ्यांवर थेट हल्ले करणे या घटना वाढल्या आहेत. हिंदू कुटुंबांना सार्वजनिक स्थळी पूजा करत असताना लक्ष्य केले जात असेल तर, ही गोष्ट खूप गंभीर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ब्रॅम्प्टनमधील “हिंदू सभा मंदिरात” खलिस्तानी समर्थकांनी तर हिंदू भक्तांवर लाठीहल्ला केला होता. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी अनेकांनी प्रशासनाच्या प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली होती. वस्तुतः धार्मिक स्वातंत्र्य हा मूलभूत मानवाधिकार आहे, आणि त्याचे रक्षण करणे केवळ सरकारचेच नव्हे, तर सर्व समाजाचेही कर्तव्य आहे. द्वेषाचे राजकारण, कोणत्याही देशात, कोणत्याही धर्मासाठी, स्वीकारार्ह ठरू शकत नाही. कॅनडाच्या शासनाने आणि पोलिस प्रशासनाने या घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर पावले उचलली पाहिजेत, अन्यथा सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो.
3.युनायटेड स्टेट्स
2025 मध्ये कॅलिफोर्नियातील BAPS श्री स्वामिनारायण मंदिरावर “हिंदुस्तान मुर्दाबाद” आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील अपशब्द असलेली भित्तीचित्रे आढळून आली होती. तसेच न्यू जर्सी, न्यूयॉर्क, सॅक्रामेंटो आणि न्यूआर्क येथील हिंदू मंदिरांवर तोडफोड आणि लूटमार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये धार्मिक द्वेष प्रकर्षाने दिसून आला. खरतर हिंदू मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर ते एक सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र असते. त्यामुळे मंदिरावर हल्ला करणे म्हणजे त्या समुदायाच्या अस्तित्वावरच घाला घालण्यासारखे असते. या विरोधात तेंव्हा FBI आणि स्थानिक पोलिसांकडून काही घटनांमध्ये तपास सुरू केला होता पण अनेक प्रकरणांमध्ये पीडितांनी तक्रार न केल्याने किंवा अहवाल नोंदवले न गेल्याने समाधानकारक कारवाई होऊ शकली नाही.
4.पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये इस्लाम नंतर हिंदू हा सर्वात मोठा धर्म आहे पण असे असले तरी इथे गेल्या काही वर्षांपासून हिंदूंची संख्या कमी होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्यावर होणारे हल्ले मुस्लीम समुदाय इथल्या हिंदू समुदायावर इस्लाम स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकत आला आहे. त्यामुळे अनेकांनी दबावामुळे किंवा भितीमुळे इस्लाम धर्म स्विकारला आहे. तर काही हिंदू पाकिस्तान सोडून भारतात येत आहेत. फक्त सामान्य माणुसच नाही तर राजकीय व्यक्तीही या हल्ल्यापासून सुटु शकली नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात नवीन कालव्यांच्या योजनेविरुद्ध रॅली काढणाऱ्या निदर्शकांनी चक्कं एका हिंदू राज्यमंत्र्यांवर हल्ला केला होता. यावरून पाकिस्तानातील हिंदू कसे राहत असतील याचा अंदाज येतो.
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील ३ मंदिरांना लक्ष खलिस्तान वाद्यांनी लक्ष केले आहे, तसेच अफगाणिस्तान, मलेशिया, आणि इंडोनेशिया येथेही अनेक वेळा हिंदुंवर आणि हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत आणि जबरदस्ती धर्मांतरण केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे. लव जिहाद हा त्यातलाच एक प्रकार आहे. असे सगळ्या असताना या सगळ्या परिस्थितीवर फक्त भाजपच आवाज उठवताना दिसतो.देशातील विरोधी पक्ष अशा हल्ल्याचा निषेध करताना फारसे दिसत नाहीत. आता पहलगाममध्ये हिंदुवर हल्ला झाल्यानंतर विरोधक जसे एकत्र आले तसे परदेशात जेंव्हा हिंदुंवर हल्ला होतो तेंव्हा ते एकत्र का येत नाहीत? यावर ते निषेध व्यक्त का करत नाहीत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
कारणे आणि उपाय
कारणे
विविध धर्मीय समुदायांमध्ये सहिष्णुतेचा अभाव आणि द्वेषपूर्ण विचारधारा या गोष्टी हल्ल्यांच्या मुख्य कारणांपैकी एक आहेत. अनेक हिंदू आपल्यावर झालेल्या हल्ल्यांबद्दल तक्रार करत नाहीत, त्यामुळे अशी गुन्हेगारी वाढते. तसेच स्थानिक प्रशासनाकडूनही अनेक वेळा याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक देशांमध्ये ‘हेट ग्रुप्स’ सक्रिय आहेत, जे विशिष्ट धर्मांबद्दल द्वेष पसरवतात. याव्यतिरिक्त काही वेळा स्थानिक राजकारणात द्वेष निर्माण करून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले घडवून आणले जातात. तसेच हिंदू विरोधी प्रचार, सोशल मीडियावर पसरवलेले खोटे मेसेज आणि हिंदूंच्या विरोधातील चिथावणीखोर भाषणेही हल्ल्यांना खतपाणी घालतात.
उपाययोजना
कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणे: कोणत्याही धर्मावर हल्ला होऊ नये यासाठी पोलिस आणि प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत तसेच गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा झाली पाहिजे.
माध्यमांची जबाबदारी: मीडिया आणि सोशल मीडियाने द्वेष पसरवण्याऐवजी शांतता आणि ऐक्य यांचा प्रचार केला पाहिजे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
सामाजिक ऐक्य वाढवणे: विविध धर्मांतील लोकांमध्ये संवाद आणि समज वाढवण्यासाठी कार्यक्रम, चर्चासत्रे, सांस्कृतिक देवाणघेवाण यांचा वापर होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय दबाव: ज्या देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात, तिथे भारताने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांनी राजनैतिक व मानवी हक्कांच्या माध्यमातून दबाव आणावा.
एकूणच हिंदूविरोधी हल्ले हे केवळ हिंदू समुदायासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी चिंता निर्माण करणारी जागतिक समस्या बनली आहे. ही केवळ धार्मिक नव्हे तर मानवी हक्कांची पायमल्ली देखील आहे. विविध देशांमध्ये या घटनांच्या वाढत्या प्रमाणामुळे जागतिक पातळीवर धार्मिक सहिष्णुतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना आणि जागतिक सहकार्य आवश्यक आहे. धार्मिक सहिष्णुता आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तसेच दहशतवाद संपवण्यासाठी व्यापक असा लढा उभारला पाहिजे.