पहलगाममध्ये गेलेले २६ निष्पाप पर्यटक. त्यांचे एकमेव स्वप्न होते निसर्गसौंदर्य अनुभवायचे, काश्मीरच्या कुशीत थोडा वेळ घालवायचा.पण त्यांना भेटलं काय? बंदुकीच्या गोळ्या, दहशतवाद्यांचे बिनधास्त कारस्थान. आणि या सगळ्यामागे उभा राहिला होता पाकिस्तान. ही केवळ एक दुर्घटना नाही तर ही निर्दय क्रूरता आहे, जी भारताला वारंवार सहन करावी लागत आहे. त्या २६ निष्पाप हिंदू पर्यटकांचा काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात झालेला बळी ही एक आकडेवारी नाही तर ही त्या अनेक घरांमधील वेदना आहे जी आयुष्यभर जखम घेऊन जगणार आहेत. पण पाकिस्तानला याचे काही स्वैर सुतक नाही.
भारताने जेंव्हा पाकिस्तानवर आरोप केले तेंव्हा त्यांनी साळसूदपणाचा आव आणून आम्ही दहशतवादी कारवांचे समर्थन करत नाही असे म्हटले आहे. पण एकीकडे पाकिस्तान असे बोलत असताना दुसरीकडे मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या सिमेवर पाकिस्तान सैन्य सातत्याने शस्त्र संधीचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. मग पाकिस्तानवर विश्वास ठेवणार तरी कसा. त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने चारीबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरूवात केली आहे. आधी मोदींनी पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचे पाणी अडवले, त्यानंतर नुकतेच भारताविरुद्ध चुकीची माहिती प्रसारित करणारे युट्यूब चॅनल भारतात बॅन केले. आणि आता आणखी एक मोठा निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. तो निर्णय म्हणजे भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत बंद केले आहे. ज्यामुळे पाकिस्तानला कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांचे समर्थन करणे थांबवणार नाही तोपर्यंत या कारवाया सुरुच राहतील असे भारत सरकारने म्हटले आहे.
पाकिस्तान: दहशतीचा कायमचा आश्रयदाता?
सततचे नकार, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरचे खोटे बोलणे, आणि दहशतवादी संघटनांना मूक समर्थन हा पाकिस्तानचा इतिहास आहे. ‘लश्कर-ए-तैयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ अशा अनेक संघटनांचा जन्म पाकिस्तानच्या जमिनीत झाला आणि पोषणही तिथेच झाले. या संघटनांनी भारतात केवळ सैनिकांनाच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले आहे. आणि ही सगळी कृत्ये करताना पाकिस्तान नेहमी “आम्ही याचे समर्थन करत नाही” अशी दुहेरी भूमिका घेत आलेला आहे.
भारताचा कठोर निर्णय, संयम संपला
काश्मीरमध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेला हल्ला भारताच्या संयमाची परिसीमा ओलांडणारा होता. भारताने शांततेसाठी अनेक वेळा प्रयत्न केले. अनेक वेळा संयम दाखवला, दरवेळी जागतिक समुदायासोबत उभे राहत पाकिस्तानला समजावण्याचा प्रयत्न केला. पण जिथे मुळेच कुजलेली असतात, तिथे फुले फुलत नाहीत. आता पाकिस्तानने भारतावर केलेला हा काही पहिलाच हल्ला नाही तर १९९९ मध्ये झालेला कारगिल हल्ला, २००८ मधील मुंबई हल्ला, २०१९ मधील पुलवामा हल्ला. असे अनेक हल्ले पाकिस्तानने घडवून आणले आहेत ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता तर धर्म विचारुन पर्यटकांना गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे भारताने आपल्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानच्या विमानांना प्रवेश नाकारून एक स्पष्ट संदेश दिला आहे “तुम्ही जर आमच्या जनतेच्या जीवाशी खेळाल, तर आम्ही तुमचे जगणे कठीण करू.”
परिणाम: पाकिस्तानचे पंख छाटले
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA) आधीच आर्थिक अडचणीत होती. भारताच्या हवाई क्षेत्राच्या बंदीने ती आणखी खोल खाईत ढकलली गेली आहे. भारताच्या आकाशातून जाणाऱ्या विमानमार्गांमुळे पाकिस्तानला थेट, किफायतशीर मार्ग मिळत होता. आता त्यांना दुहेरी इंधन खर्च, वेळ आणि आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. हे केवळ त्यांच्याच विमानसेवेपुरते मर्यादित नाही, तर देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम होतील.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचा डाव उघड
अमेरिका, युरोप, आंतरराष्ट्रीय संस्था सगळ्यांनी पाकिस्तानला एकाच प्रश्नाने घेरले आहे: तुम्ही दहशतवाद्यांना थांबवणार कधी? प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या तोंडात एकच उत्तर “आम्हाला काही माहित नाही.” पण जग आता आंधळं नाही. उपग्रह छायाचित्रे, कॉल ट्रॅकिंग, आर्थिक व्यवहारांचे पुरावे या सगळ्या गोष्टी पाकिस्तानच्या खोटेपणावर प्रकाश टाकत आहेत.
भारत शांतताप्रिय, पण दुर्बल नाही
पाकिस्तान अनेकदा म्हणतो, “आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही.” पण लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांचे तळ कुठे आहेत? मसूद अझर, हाफिज सईद यांना पाकिस्तानने संरक्षण का दिले? पण आता भारताला माहित आहे की जे जग नाकारते, ते पाकिस्तान पोसते. वस्तुतः भारत हा नेहमीच शांततेचा आणि समन्वयाचा पाठीराखा राहिला आहे. पण शांतता ही दुर्बलतेचं लक्षण नसते. भारताचे नागरिक मारले जात असतील, महिलांच्या कळपांवर हल्ले होत असतील, तर भारतकडून केवळ निवेदने नाही, तर कृतीची अपेक्षा ठेवावी लागेल आणि हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय हेच दाखवतो.
वास्तविक भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद करणे ही केवळ सुरुवात आहे. जर पाकिस्तानने आपली भूमिका बदलली नाही आणि दहशतवाद्यांना थारा दिला, तर भविष्यात आणखी कडक उपाययोजना शक्य आहेत मग त्यामध्ये व्यापार बंद, पाणी करार आंतरराष्ट्रीय मंचांवर बहिष्कार अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. पाकिस्तानसाठी हा एक सुस्पष्ट इशारा आहे: दहशतवाद सोडून शांततेकडे या, नाहीतर भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही किंमत मोजण्यास मागेपुढे पाहणार नाही.खरतर हा निर्णय केवळ सरकारचा नाही, तर एका जाणीवशील, आत्माभिमानी देशाचा आहे. ज्यांच्या रक्तात देशभक्ती आहे, ते मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे नक्कीच स्वागत करतील.