ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेनेचा उत्साह आणि सतर्कता अधिक वाढली असल्याचे दिसून येत आहे. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यातील दहशतवाद्यावर केलेली कारवाई. चंदेल हा आदिवासी बहुल डोंगराळ जिल्हा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने नागा लोक राहतात. त्याचे झाले असे की, १४ मे २०२५ रोजी भारत-म्यानमार सीमेला लागून असलेल्या मणिपूर येथील न्यू समतल गावाजवळ आसाम रायफल्स आणि काही अज्ञात अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १० दहशतवादी ठार झाले. ही कारवाई नियोजित आणि अचूकपणे अंमलात आणल्याचा लष्कराचा दावा असून, ती अजूनही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कारवाईचे स्वरूप
बुधवारी चंदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलजवळ असलेल्या न्यू समतल गावाजवळ काही सशस्त्र दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती आसाम रायफल्सच्या युनिटला मिळाली. या माहितीवरून त्यांनी कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला उत्तर देताना जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत १० जण ठार झाले. हे ठिकाण राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे १३० किमी अंतरावर आहे. लष्कराच्या पूर्व कमांडने सांगितले की, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे. ही माहिती त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावरून दिली. ही घटना पूर्वोत्तर भारतातील अशांत भागांत होणाऱ्या अतिरेकी हालचालींना रोखण्यासाठी सुरक्षादलांनी उचललेले एक निर्णायक पाऊल आहे.
Acting on specific intelligence on movement of armed cadres nearby New Samtal village, Khengjoy Tehsil, #Chandel District near the #Indo_MyanmarBorder, #AssamRifles unit under #SpearCorps launched an operation on 14 May 2025.
During the operation,… pic.twitter.com/KLgyuRSg11
— EasternCommand_IA (@easterncomd) May 14, 2025
देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क व सक्रिय
मणिपुरमधील सुरक्षा यंत्रणा, विशेषतः आसाम रायफल्सच्या प्रयत्नांमुळे दहशतवाद्यांविरुद्ध ही प्रभावी कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हे सशस्त्र अतिरेकी अपहरण, विविध गुन्हे आणि कंत्राटदार, व्यापारी, सरकारी कर्मचारी आणि सामान्य लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यात सहभागी होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात सशस्त्र दहशतवाद्यांनी एका महिलेची निर्घृण हत्या आणि घरे जाळून लुटल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बंदी घातलेल्या दहशतवादी गटांशी संबंधित दोन व्यक्तींना अटक केली आहे, हे दोन्ही आरोपी १७ मे पर्यंत एनआयए कोठडीत असून ज्याचा तपास सुरू आहे. या कारवाई नंतरची मनिपूरमध्ये झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. यावरुन भारतीय सैन्य संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
सीमावर्ती सुरक्षेचे आव्हान
म्यानमारसोबतची १६४३ किमी लांब खुली आणि कठीण भूगोल असलेली सीमा भारतीय सुरक्षादलांसाठी दीर्घ काळापासून एक आव्हान आहे. या भागातील अनेक बंडखोर गट सीमा ओलांडून लपतात, प्रशिक्षण घेतात आणि पुन्हा भारतीय प्रदेशात प्रवेश करतात. त्यामुळे अशा कारवाया फक्त एकदाच होऊन थांबत नाहीत, तर त्या सातत्याने आणि योजनाबद्ध रितीने पार पाडणे आवश्यक आहे.मात्र सध्या ही कारवाई चंदेल जिल्ह्यासाठी सुरक्षा आणि स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, स्थानिक जनतेमध्ये सुरक्षादलांविषयी विश्वास निर्माण करणारी आहे.
इतर कारवाया:
ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन केल्लरला सुरुवात
१३ मे २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील शोकल-केल्लरच्या घनदाट जंगलात हे ऑपरेशन राबवण्यात आले. राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटला मिळालेल्या अचूक गुप्तचर माहितीनंतर कारवाई सुरू झाली.ज्यामध्ये २४ तासांतच तीन लष्कर-ए-तैयबा च्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.शाहिद कुट्टे, अदनान शफी दार व हरिस नझीर, अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. ज्यामध्ये
शाहिद कुट्टे – डॅनिश रिसॉर्ट हल्ला, १८ मे २०२४ रोजी हिरपोरा येथे भाजपाच्या सरपंचाची हत्या आणि जवानाच्या हत्येत सहभाग.
अदनान शफी दार – कामगाराच्या हत्येचा आरोपी.
हरिस नझीर – एलईटीशी जोडलेला दहशतवादी.
ऑपरेशनचा उद्देश:
1.सीमापार दहशतवादाला आळा घालणे.
2.गुप्तचर माहितीच्या आधारे धोके नष्ट करणे.
3.‘दहशतवादमुक्त काश्मीर’ या उद्दिष्टाला बळ देणे.
स्थानिक सहभाग आणि इनाम योजना
शोपियानमध्ये सध्या “दहशतवादमुक्त काश्मीर” असे लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत, जे दहशतवादाविरोधातील जनजागृतीचे प्रतीक आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दहशतवाद्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास ती देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.‘ऑपरेशन केल्लर’ ही मोहिम जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादविरोधी प्रयत्नांचा भाग आहे. यामुळे सीमापार दहशतवादी कारवाया रोखण्यास मोठी मदत होईल, असे मानले जात आहे.
एकुणच भारतीय सुरक्षा यंत्रणा आता अधिक आक्रमक, सतर्क आणि रणनीतीनुसार कार्यरत झाल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यातील कारवाई आणि जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन केल्लर या दोन्ही कारवायांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे देशाच्या अंतर्गत आणि सीमावर्ती सुरक्षेला बळकटी देणे. अशा कारवायांच्या माध्यमातून एकीकडे दहशतवाद्यांचे मनोबल खचवले जात आहे, तर दूसरीकडे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षाव्यवस्थेवरचा विश्वास दृढ होताना दिसत आहे.