भारतात “स्वातंत्र्य”, “लोकशाही”, “माध्यमांची मोकळीक” यांची खूप चर्चा होते. आणि हे खरेही आहे. या मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात वेगळी ठरते. पण याच मोकळीकचा गैरफायदा घेत काही प्रसारमाध्यमे देशाच्या हिताविरुद्ध काम करत आहेत.याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे द हिंदू वृत्तपत्र. द हिंदू हे एक इंग्रजी दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडू येथे आहे आणि याचे मालक आहेत कस्तुरी अँड सन्स लिमिटेड. तर याचे प्रकाशक एन. रवी आहेत पण गेल्या काही वर्षांपासून हे वृत्तपत्र अनेकदा भारतविरोधी आणि चीनसमर्थक वृत्तांकन करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अँटी इंडिया न्यूज पेपर’ म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. पण हे वृत्तपत्र भारतात असून ते चीनच्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या माध्यमासारखे का वागत आहे? असा सवाल उपस्थित होतो आहे. या वृत्तपत्राने नेमका काय खोडसाळपणा केलाय? तेच या लेखाच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया.
भारताच्या नकाशातून सिक्कीम गायब?
१३ मे २०२५ रोजी द हिंदूने एक लेख प्रकाशित केला ज्यात भारताचा नकाशा दाखवण्यात आला. पण त्यामध्ये सिक्कीम हे संपूर्ण राज्य गायब होते. चक्क गायब एक अख्खं राज्य नकाशातून गायब करणे ही छोटी चूक नव्हती, तर भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित असलेली ही अत्यंत गंभीर चूक होती. लोकांच्या रोषानंतर दुसऱ्या दिवशी हिंदूने “डेटा एरर” म्हणून माफी मागितली. पण प्रश्न असा आहे, देशाच्या नकाशात इतकी मोठी चूक “योगायोगाने” कशी होऊ शकते? एवढ्या मोठ्या वृत्तसंस्थेकडून अशी चूक का झाली? यावर अद्याप सखोल स्पष्टीकरण मिळालेले नाही.
Due to a data input error, the India map in the article, “With a new Pope, an understanding of Catholicism in India”, which appeared in the Data Point section on May 13, 2025, was incorrectly presented with the contours of Sikkim State being shaded out. We apologise for the…
— The Hindu (@the_hindu) May 14, 2025
खोटी बातमी: तीन भारतीय विमाने कोसळली?
७ मे २०२५ रोजी द हिंदूने एक ब्रेकिंग न्यूज दिली की जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन भारतीय विमाने कोसळली आहेत. ही बातमी वाचून देशभरात खळबळ माजली. पण नंतर समजले की ती “फेक न्यूज” होती! प्रत्यक्षात कोसळलेली वस्तू एक इंधन टाकी होती, विमान नव्हे. हे लक्षात आल्यावर द हिंदूने पोस्ट डिलीट केली आणि क्षमा मागितली. अशा प्रकारे अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा हा प्रकार पत्रकारितेच्या नैतिकतेला काळिमा फासणारा ठरतो. तसेच एखाद्या युद्धजन्य वातावरणात अशा बातम्या देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकतात.
Damage has been done, all foreign media are picking up this fake story by @the_hindu, and confirming Pakistan's narrative of downing 5 indian planes.. @the_hindu should be banned for spreading fake news in the hour of emergency without fact chekcing pic.twitter.com/BxGW8Gim9Y
— SC ST Hindu (@scsthindu) May 7, 2025
चीनचा पाठपुरावा करणारे लेख
२०२४ मध्ये द हिंदूने नेपाळ आणि चीनमध्ये झालेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) करारावर एक लेख लिहिला. या लेखात हा करार नेपाळच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. पण चीनचा BRI प्रकल्प हा केवळ आर्थिक नाही, तर धोरणात्मक आणि सामरिक हेतूंनी चालवला जातो, हे माहीत असूनही हिंदूने चीनच्या बाजूने भूमिका घेतली. त्याच वर्षी, अमेरिकेने चीनच्या चिप उद्योगावर निर्बंध घातले तेव्हा द हिंदूने चीनची बाजू घेत, अमेरिका अन्याय करत असल्याचा सूर लावला. याशिवाय चीनच्या लष्करी ताकदीचे समर्थन करणारे आणि अमेरिका व इतर पश्चिमी राष्ट्रांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अनेक लेख ‘द हिंदू’ने प्रकाशित केले.
आरोग्यविषयक लेखांतूनही चीनची स्तुती
१८ नोव्हेंबर २०२४ च्या लेखात, हिंदूने भारतातील वाढत्या मधुमेहाच्या संकटाचा उल्लेख करताना चीनच्या आरोग्य यंत्रणेचे भरभरून कौतुक केले. तर यामध्ये मधुमेहाच्या संकटाबाबत भारताची भूमिका तोकडी दाखवत चीनचा सक्रिय दृष्टिकोन आदर्श म्हणून उभा करण्यात आला. अशा तुलनात्मक लेखांतून भारताच्या व्यवस्थेकडे वाचकांचा अविश्वास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खर म्हणजे चीनसारख्या हुकूमशाही देशाची व्यवस्था एक आदर्श म्हणून मांडणे हे एकतर्फी आणि पक्षपाती आहे.
गलवान संघर्षातील एकतर्फी मांडणी
गलवान खोऱ्यात २० सैनिक शहीद झाले, हा प्रसंग साऱ्या भारतासाठी अस्वस्थ करणारा होता. पण द हिंदूने या विषयावर ज्या पद्धतीने बातम्या दिल्या, त्या वाचून असे वाटते की त्यांनी चीनच्या अधिकृत वक्तव्यांनाच जास्त महत्त्व दिले. चिनी लष्कराचे दावे, त्यांचे निषेध, त्यांचे स्पष्टीकरण यांना लेखांमध्ये स्थान मिळाले; पण यामध्ये भारताची बाजू समोर आली नाही असे लेख वाचकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे ते काय खरे आणि काय खोटे हे ठरवू शकत नाहीत
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसाठी जाहिरात
२०२२ मध्ये चीनचे राजदूत ‘द हिंदू’च्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर त्या भेटीचा फोटो वृतपत्राच्या सोशल मीडियावर झळकलेला पाहायला मिळाला. यावरून दोघांमधील घनिष्ठ संबंध स्पष्ट होतात. तसेच २०२१ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १००व्या वर्धापन दिनानिमित्त द हिंदूने पूर्ण पानभर जाहिरात छापली होती. यात चीनच्या धोरणांची स्तुती करणारे लेख होते. ही एक व्यवसायिक निवड असू शकते, पण यामुळे भारतात राहून भारतातच चीनचा प्रचार करणारे माध्यम असल्याचा आरोप अधिक बळकट होतो.
संपादकीय स्वातंत्र्य की भारतविरोधी अजेंडा?
प्रश्न असा आहे की द हिंदू यांना यासाठी पैसे मिळतात का? की हे फक्त एका ठराविक विचारसरणीचा प्रभाव आहे? एकीकडे डाव्या विचारांच्या प्रभावाखाली असलेली ही माध्यम संस्था चीनसारख्या हुकूमशाही देशाची पाठराखण करते, तर भारताच्या सरकारवर नेहमीच शंका घेत राहते. माध्यमांना सरकारवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण ती टीका तटस्थ आणि वास्तवाधारित असली पाहिजे. जर ती एखाद्या दुसऱ्या देशाच्या फायद्यासाठी केली जात असेल, तर ती पत्रकारिता नसून प्रचार आहे.
खरं म्हणजे मुक्त माध्यमं लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहेत, पण तीच माध्यमं जर राष्ट्रहिताविरोधात वापरली गेली, तर ती धोकादायक ठरू शकतात. द हिंदूच्या संदर्भात ज्या ३२ घटनांचा तपशील समोर आला आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की एकाच प्रकारचा चीनसमर्थक आणि भारतविरोधी दृष्टिकोन वारंवार मांडला जातो. भारतवासीयांनी ही गोष्ट समजून घ्यावी की कोणतेही वृत्तपत्र “विश्वसनीय” आहे असे समजण्याआधी त्याचे लिहिण्याची दिशा, हेतू आणि वारंवारता समजून घेणे आवश्यक आहे. पत्रकारितेचा खोटा मुखवटा घालून जर कोणी दुसऱ्या देशाचा प्रचार करत असेल, तर त्याला वेळेत रोखणे हे आपले कर्तव्य आहे.
आपण पत्रकारांकडून काय अपेक्षा ठेवतो? त्यांनी खरी माहिती द्यावी, की आपल्या विचारांना योग्य वाटेल असे दाखवावे? शेवटी निवड तुमची आहे. ‘द हिंदू’सारखं वृत्तपत्र जर अशा चुकांमध्ये वारंवार अडकत असेल तर ही केवळ चूक नाही तर ही एक प्रवृत्ती आहे. म्हणून वाचकांनी सजग होणे आज काळाची गरज आहे. कारण जर माध्यमच झुकले तर सत्य कोण उभे करणार?