Saifullah Khalid:दहशतवाद केवळ एका देशाची समस्या राहिली नसून आता दहशतवादाची किड अख्खे जग पोखरू पाहत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे केवळ भारतच नाही तर जगातील बलाढ्य देशांसमोर दहशतवादाचा मोठा प्रश्न वासून उभा आहे. नुकतेच ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यात जवळपास 110 दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरअंतर्ग पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा मुदस्सर खादियान खास, जैश-ए-मोहम्मदचा हाफिज मुहम्मद जमील, जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी, लष्कर-ए-तोयबाचा खालिद उर्फ अबू आकाश आणि जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद हसन खान यांचा खात्मा झाला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यातच आता लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह खालिद याची १८ मे रोजी हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अबू सैफुल्लाहचा अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडत त्याची हत्या केली आहे. यापूर्वी त्याच्या हालचालींवर लक्ष असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. त्याला अलर्टही करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेत वाढ करून घेतली होती. मात्र १८ मे रोजी तो जेव्हा माटली तालुक्यातील घराबाहेर पडला तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. मात्र त्याच्या हत्येमागचा सूत्रधार कोण हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
कोण होता सैफुल्लाह खालिद:
सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जायचा. सैफुल्लाह लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता. तो हाफिज सईदचा खूप जवळचा मानला जायचा. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांचा तो मुख्य चालक होता. सैफुल्लाहचे पूर्वी नेपाळमध्ये वास्तव्य होते. मात्र नुकताच तो पाकिस्तानमध्ये राहायला गेला असल्याची माहिती समोर आली होते. तिथे तो काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासाच्या संरक्षणाखाली राहत होता. लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवण्याचे काम तो करत असे.
भारतातील तीन मोठ्या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालिदचा हात होता:
– 2001 मध्ये रामपूर येथे झालेला सीआरपीएफ कँपवरील हल्ल्यात सैफुल्लाहचा हात होता.
– 2005 मध्ये बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवर झालेल्या हल्ल्यामध्येही त्याचा सहभाग होता.
-2006 मध्ये नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ल्यातही सैफुल्लाचा सहभाग होता.
गेल्या काही महिन्यांपासून कुख्यात दहशतवाद्यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. आणि विशेष योगायोग म्हणजे या सर्व घटना पाकिस्तानातील आहेत. यापूर्वी, लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कटाल १५ मार्चच्या रात्री पाकिस्तानमध्ये मारला गेला होता. पंजाब राज्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली होती.
अबू कटाल हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा होता. कटाल हा लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख सदस्य होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल तो ओळखला जात होता.
मुफ्ती शाह मीर याचे १४ मार्च रोजी पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये निधन झाले. शुक्रवारी रात्री अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या . कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात मुफ्ती मीरने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला मदत केली असल्याचे समोर आले होते.
लष्कर ए तोयबाचा वरिष्ठ कमांडर असलेला मौलाना काशिफ अली याचीही अश्याच प्रकारे फेब्रुवारीमध्ये हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, सैफुल्लाह खालिदची हत्या ही गोष्ट भारतासाठी इष्टापत्ती म्हणायला हवी. कारण सैफुल्लाह खालिदने अनेकदा भारता विरोधी कारवाया केल्या आहेत. तसेच आता भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा या यादीत समावेश असून ही यादी पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे. या यादीमध्ये दुश्मन हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अजहर यांची नावे आहेत. दहशतवादी द्या आणि विश्वसनीयता सिद्ध करा, असा प्रस्ताव भारताकडून पाकिस्तानला देण्यात येणार आहे.