Devendra Fadanvis:महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेवटच्या निवडणुका 2016-17 मध्ये पार पडल्या होत्या. कारण 2021 मध्ये ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्या संस्थाच्या निवडणुका रखडल्या होत्या. परंतु नुकतेच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्र, यावरून विविध चर्चांणा रंगताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेत्यांची भूमिका जाणून घेऊयात.
महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया:
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्र निवडणूक लढवणार की नाही यावरती नुकतीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की , “आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढणार आहोत. परंतु शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे निवडणुकीमध्ये खूप तुल्यबळ असते अशा वेळी दोन्ही पक्षांसमोर अडचणी निर्माण होतो. परंतु अशा ठिकाणी आम्ही समजूतीने वेगळे लढू. अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार आम्ही करु. पण जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करु.”
-“लोकसभा विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो. विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकलो आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाही आम्ही महायुती म्हणून लढविणार आहोत,” असे शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच म्हणाले आहेत.
-अजित पवार यांनी १८ मे रोजी मुंबईतील विधानभवन येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शिवला आहे. अर्थातच महायुती एकत्र निवडणूक लढेल हे मान्य करत अजित पवार पुढे म्हणाले की, “शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असणार आहे. जिथे तुल्यबळ स्पर्धक असतील तिथे अपवादत्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करत आम्ही स्पर्धा करू. कार्येकर्ते अनेक वर्ष काम करत असतात त्यामुळे त्यांनाही संधी मिळायला हवी. परंतु निवडणुकीत जरी काही ठिकाणी वेगळे लढलो तरी निवडणुकीनंतर निश्चितच पुन्हा युती होईल.”
एकंदरित महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पूर्णपणे ताळमेळ असल्याचे दिसत आहे. तसेच महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता हे लक्षात येते की महायुती काही ठिकाण एकत्र लढणार आहे तर तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र लढणार आहे. परंतु महायुतीमध्ये पूर्णपणे सांमजस्य असून कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट होते.
महाविकास आघाडीची भूमिका काय:
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की नाही, याबाबत आघाडीत अद्यापही स्पष्टता नसल्याचे चित्र दिसत आहे.
-राज्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना काॅंग्रेसशी भूमिका स्पष्ट केली आहे. सपकाळ म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर मित्रपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. परंतु जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेण्याचा आमचा विचार असेल.”
-राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाविषयी बोलायचे झाल्यास पक्षाच्या वतीने मुंबईत २६, २७, २८ मे रोजी सलग तीन दिवस महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांचा मूळ उद्देश हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नियोजन करणे हाच आहे. त्यामुळे या बैठकीनंतर शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवणार की नाही याबाबतीत काहीशी स्पष्टता येऊ शकेल.
-तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली पाहता उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली होती. तसेच उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका अत्यंत महत्वाची आहे कारण उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे किमान मुंबईत तरी ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.
एकंदरित महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिका पाहता महाविकास आघाडीमध्ये काहीसे मतभेद असल्याचे जाणवते. महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राज्यात सध्या प्रमुख सहा राजकीय पक्ष सक्रिय आहेत. त्यातच अनेक लहान पक्षांनीही काही जागांवर निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे चुरस वाढणार आणि परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही विधानसभेप्रमाणे रोमांचक होणार हे निश्चित.